सातारा जिल्ह्यात मुसळधार, नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा
सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यात पावसामुळे नदीकिनारी पुरसदृश परस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अधिक वाचा
- राज्यात सर्वदूर पाऊस! कोल्हापूरसह कोकणात मुसळधार, अनेक ठिकाणी पूरस्थिती
- चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी २४ तासात १८५ मिलिमीटर पाऊस
बुधवारपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. संगम माहुली गावातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याने येथील असलेल्या महादेव मंदिराच्या पायथा आणि कैलास स्मशान भूमीच्या पायऱ्या पाण्याखाली बुडाल्या आहेत.
चतुरबेट पुल पाण्यात खाली १२ गावांचा संपर्क तुटला
प्रतापगड; पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या चतुरबेट गावाला जोडणारा मुख्य पुल पाण्याखाली गेल्याने चतुरबेट सह अन्य १२ गावांचा संपर्क तुटत आहे.
गेले अनेक वर्षे पुलाची उंची वाढवण्यासाठी मागणी होत आहे.या बाबत दैनिक पुढारी ने यावर सतत आवाज उठवला आहे.
चतुरबेट पूल या ठिकाणी रू.550.0 लक्ष किंमतीचे उंच पूलाचे काम मार्च 2021 अर्थसंकल्पात मंजूर असून,पुढील वर्षी या ठिकाणी अशी वेळ येणार नाही.असे बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार
दरम्यान, महाराष्ट्राची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गुरुवारी पहाटेपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात प्रतिसेकंद तब्बल दीड लाखांहून अधिक क्युसेक पाण्याची आवक होऊ लागली आहे.
बुधवार सायंकाळी पाच वाजता धरणात ५८.५१ टीएमसी पाणी होते. गुरुवारी सकाळी सहा वाजता धरणात ६६.७५ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता.
महाबळेश्वर, नवजा, कोयना या धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे.
मागील अकरा तासांत कोयना धरणात सरासरी ८४ हजार ४१६ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे.
कृष्णा आणि कोयना नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
सातारा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि कोयना या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत अगोदरच मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
त्यातच आता कोयना धरणाचा पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे.
हेही वाचलं का?