सांगली : गळवेवाडीतील दोन राजकीय गटावर पोलिसांचा लाठीहल्ला

सांगली : गळवेवाडीतील दोन राजकीय गटावर पोलिसांचा लाठीहल्ला

आटपाडी (सांगली); पुढारी वृत्तसेवा : आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी येथे ग्रामपंचायत निवडणूक कारणावरून भाजप आणि शिवसेना गटात वादावादी आणि मारामारी झाली. याबाबात तक्रार देण्यासाठी सोमवारी सकाळी आटपाडी पोलीस ठाण्यात प्रचंड गर्दी झाली. तक्रार ऐकून किंवा दाखल करण्याऐवजी या गर्दीला पांगविण्याचा प्रयत्न झाला. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने तणावात भर पडली. दोन गटातील वादंगामध्ये पोलिसांच्या अनावश्यक आक्रमकपणाच्या भूमिकेने मुळ विषय बाजूला पडला. आटपाडी पोलिसांनाच टीकेचे धनी व्हावे लागले.

रविवारी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गळवेवाडीमध्ये मतदान झाले. चुरशीच्या लढतीत पूर्वी एकाच पक्षात आणि चांगले सख्य असलेले दोन नेते दोन पक्षात विभागले गेले. सरपंच पदावरील दोन दशकांची मक्तेदारी दोघांमधील मतभेदाचे कारण ठरली. मतदानाच्या दिवशी किरकोळ कारणावरून भाजप आणि शिवसेनेच्या गटात वादावादी आणि हाणामारी झाली.

मतदानाच्यानंतर आज सकाळी परत एकदा वादाला नव्याने तोंड फुटले. गळवेवाडीमध्ये पुन्हा दोन गटात वादावादी झाली. याबाबत उमेदवार आणि समर्थक स्त्री पुरुष कार्यकर्त्यांनी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी आटपाडी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी झाली.

दरम्यान दोन वेळा बाचाबाची आणि वादावादी झाल्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात पुन्हा हे दोन गट एकमेकाला भिडले. त्यामुळे ठाण्याच्या आवारातच गोंधळ झाला. हा गोंधळ थांबवण्यासाठी आटपाडी पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. पोलिसांनी जमावातील महिलांवरच काठ्या उगारल्या. त्यामुळे आधीच्या गोंधळात आणखीन भर पडली.

त्यामुळे तक्रार देण्यासाठी गळवेवाडीतून आलेल्या दोन गटातील लोकांची भंबेरी उडाली. लाठी हल्ला झाल्याने लोकांनी दिघंची रस्त्यावरील महावितरण कार्यालयाकडे धाव घेतली. तक्रार ऐकून घेण्याऐवजी पोलिसांनी लाठीचार्ज केला. या भुमिकेवरच गळवेवाडीतील एका गटाच्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी हरकत घेतली. उपनिरीक्षक अजित पाटील यांच्यावरच गंभीर आरोप करण्यात आले.

उपनिरीक्षक पाटील यांनी शिवीगाळ केली. महिलांना मारहाण केल्याचे सांगत त्यांच्याविरोधात आंदोलनाचा इशारा प्रमुख कार्यकर्त्यांनी दिला. निवडणुकीच्या निमित्ताने पोलिसांचा हस्तक्षेप संशयास्पद असल्याचे सांगत कारवाईसाठी पोलीस ठाण्यातच आक्रमक भुमिका घेतली. राजकीय नेते, गळवेवाडीतील दोन्ही गटाचे नेते आणि पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्यात बैठकीत झाली. विनाकारण दोन तास झालेल्या गोंधळावर अखेर या बैठकीत पूर्णविराम देण्यात आला.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news