जत, पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक राज्य महाराष्ट्राला खुले आव्हान देत असताना सीमा भागाची जनता डोळ्यात तेल घालून निर्णयाकडे लक्ष देऊन आहे. तिकोंडी भागात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे फलक लावून आंदोलन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मूलभूत सोयी सुविधाकडे कायमच दुर्लक्ष केले आहे, असा आरोप करत उमराणीत सरपंच, उपसरपंचासह गावकऱ्यांनी एकत्र येत महाराष्ट्राचे लक्ष वेधण्यासाठी कर्नाटक राज्याचा व देशाचा राष्ट्रध्वज फडकवला. तसेच शासनाच्या वेळकाढू भूमिकेचा तीव्र शब्दात विरोध केला.
सीमाभागातील तिकोंडी गावाच्या पाठोपाठ येथील उमराणी गावातील ग्रामस्थांनी येथील ग्रामपंचायत समोर एकत्र येत, महाराष्ट्र शासनाच्या वेळकाढू धोरणाविरोधात घोषणाबाजी केली. या घटनेनंतर गावासह तालुक्यात कर्नाटक- महाराष्ट्र वादाचे वातावरण ढवळून निघाले होते. विद्यमान सरपंच विजयकुमार नामद, उपसरपंच संजय शिंदे, राष्ट्रवादी नेते राहुल सिंह डफळे, आप्पासाहेब देशमुख, महादेव राचगोंड, माधवराव डफळे, उत्तम शिंदे, चिक्कापा धोडमनी, संजय धोडमनी, आदीसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
यावेळी सरपंच विजयकुमार नामद म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जतवर दावा केला तरी महाराष्ट्र शासनाला येथील जनतेला काय वाटतय, याची साधी विचारपूस करावी अशी वाटत नाही. शिवाय, शासनाचा प्रतिनिधी ही इकडे फिरकत नाही. हीच सीभागातील जनतेबद्दल असणारी राज्य शासनाची सौदार्यता असावी, अशीच भावना येथील जनतेची झाली आहे. त्यामुळे प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत म्हैसाळ योजनेचे टप्पे सांगून जत तालुक्यातील जनतेची मते घेऊन त्यांची दिशाभूल करण्याचे एकमेव काम शासनाने केले.