कवठेमहांकाळ: पुढारी वृत्तसेवा: रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगावाजवळ रस्त्याच्या कडेला नादुरूस्त ट्रॅक्टरला भरधाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात ४ जण जागीच ठार झाले. तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (दि.२) पहाटे तीनच्या सुमारास घडला. मृत व जखमी हे मंगळवेढा तालुक्यातील ऊस तोडणी मजूर आहेत. जखमींना मिरज येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Sangli News
या अपघातात रितेश आप्पाराया ऐवळे (वय १८),लगमव्वा तम्माराया हेगडे (वय ३०), निलाबाई परशुराम ऐवळे( वय ३, तिघेही रा. चिक्कलगी, ता. मंगळवेढा ) व शालन दत्तात्रय खांडेकर (वय ३०, रा. शिरनांदगी, ता. मंगळवेढा ) हे चार जण जागीच ठार झाले आहेत. तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. Sangli News
गुरूदत्त साखर कारखाना टाकळी येथून ऊस तोडणी मजूर घेवून मंगळवेढा तालुक्यातील चिक्कलगी गावाकडे ट्रॅक्टर (के. ए.28/ ए.बी.3569) जात होता. दरम्यान, बेल्ट बसविण्यासाठी ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उभा केला होता. चालक व मजूर बेल्ट बसवित होते. यावेळी मिरजेहून सांगोल्याकडे जात असलेल्या भरधाव ट्रकने (ए.पी.39/ यु.एम.-5388) ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, ट्रॅक्टर सुमारे साठ ते सत्तर फूट फरफटत गेला. मृतांच्या अंगावरून ट्रक गेल्याने मृतांचे शरीर छिन्नविचिन्न झाले होते.
हेही वाचा