तासगाव : स्वाभिमानीला धक्का, जोतीराम जाधव यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश | पुढारी

तासगाव : स्वाभिमानीला धक्का, जोतीराम जाधव यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

तासगाव; पुढारी वृत्तसेवा : तासगाव तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का बसला आहे. संघटनेचे तालुका अध्यक्ष जोतीराम जाधव व स्वाभिमानी शेतकरी युवा आघाडीचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

राज्यमंत्री विश्वजित कदम, युवा नेते जितेश कदम आणि तासगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महादेव पाटील यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांना पक्षात प्रवेश देण्यात आला.

यापुढील काळात जोतीराम जाधव आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश केलेल्या सर्व पदाधिका-यांना सन्मानाची वागणूक देऊ, तसेच त्यांनी मांडलेले शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची ग्वाही कृषि राज्यमंत्री विश्वजित कदम आणि जितेश कदम यांनी दिली आहे.

तर कृषि राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करणार आहे. काॅग्रेस पक्षात गेलो असलो तरी शेतक-यांशी असलेली बांधिलकी कायमच राहील, तसेच त्यांच्या प्रश्नासाठी उभारलेला लढा चालू राहिल, अशी ग्वाही जोतीराम जाधव यांनी दिली.

यावेळी तासगावचे माजी नगराध्यक्ष अजय पवार, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष रवी साळुंखे विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश पाटील, युवक नेते रोहित साळुंखे उपस्थित होते.

Back to top button