सांगली : नदीकाठच्या गावातील लोकांचे स्थलांतर सुरु : भरतवाडीचा संपर्क तुटला | पुढारी

सांगली : नदीकाठच्या गावातील लोकांचे स्थलांतर सुरु : भरतवाडीचा संपर्क तुटला

इस्लामपूर पुढारी वृत्तसेवा :  सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात सायंकाळनंतर पावसाचा जोर आणखी वाढला आहे. कृष्णा – वारणा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होवू लागली आहे.

भरतवाडी गावाचा संपर्क तुटला असून प्रशासनाने वारणा नदीकाठच्या चिकुर्डे, एतवडे खुर्द, भरतवाडी गावसतील लोकांचे रात्री स्थलांतर सुरु केले आहे. कणेगावला जोडणाऱ्या रस्त्यालाही पाणी लागले आहे. रात्री पर्यंत रस्त्यावर पाणी येवून कणेगावचाही संपर्क तुटण्याची शक्यता आहे.

दरम्यान पाणी पातळी वाढू लागल्याने सायकाळपासूनच नदी काठावर वस्ती असलेल्या शेतकऱ्यांनी आपली जणावरे सुरक्षीतस्थळी हलवण्यास सुरवात केली. रात्री प्रशासन व पोलीसांच्याकडून नदीकाठच्या लोकांना सुरक्षीतस्थळी जाण्याचे आवाहन करण्यात येत होते.

चांदोली धरण : ४ हजार ८८३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवार सकाळी आठ ते आज गुरुवार सकाळी आठ वाजेपर्यंत 24 तासात 185 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

आज (दि. २२) सकाळी आठ ते दुपारी 4 वाजेपर्यंत आठ तासात 75 मिलिमीटर असा 32 तासात एकूण 260 मिलिमीटर पाऊस येथे बरसला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी कायम आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. परिणामी आज दुपारी तीन वाजता धरणाचे दोन दरवाजे उघडून 4 हजार 883 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.

वीज निर्मिती केंद्रातून 1125 कयु सेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण व वीजनिर्मिती असा दोन्ही मिळून सहा हजार आठ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.

गतवर्षी सहा ऑगस्ट रोजी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते यंदा 14 दिवस अगोदरच धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

कृष्णा – वारणा नदीकाठावर पूर परस्थीती उदभावु शकते

पावसाचा जोर कायम राहिल्यास कृष्णा – वारणा नदीकाठावर पूर परस्थीती उदभावु शकते. त्यामुळे संभ‍ाव्य पुरपरस्थिती लक्षात घेता प्रशासनाने तयारी सुरु केली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात पाऊस सुरु आहे. बुधवारपासून पावसाचा जोर वाढत गेला. बुधवारी रात्रभर मुसळधार पाऊस सुरु होता. पावसाचा जोर वाढत असल्याने पाझर तलावातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे.

पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसाने व आोढे – अोघळी वाहू लागल्याने कृष्णा – वारणा नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

हे वाचलत का :

Back to top button