![Sangli : कार उलटल्याने दाम्पत्य जागीच ठार](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F02%2F%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नागज : पुढारी वृत्तसेवा दिंडीतून निघालेल्या वारकर्याला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव निघालेली कार मातीच्या ढिगार्यावर जाऊन उलटल्याने झालेल्या अपघातात कारमधील पृथ्वीराज दौलत चव्हाण ( वय 50), प्रियांका पृथ्वीराज चव्हाण (वय 47, दोघेही रा. कसबेडिग्रज, ता. मिरज) हे दाम्पत्य जागीच ठार झाले. कारमधील विवेक बुधाजीराव चव्हाण – पाटील (वय 52), विनया विवेक चव्हाण-पाटील (वय 50, रा. ममदापूर, निपाणी जि. बेळगाव), विलास महादेव माने व अनिता विलास माने (वय 48, दोघेही रा. सांगली) हे चौघे जखमी झाले. (Sangli)
ही घटना रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय मार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी गावाजवळ मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती अशी, पृथ्वीराज, विवेक व विलास हे तिघे सख्खे साडू असून तिघेही त्यांच्या पत्नींसमवेत कार (के. ए. 23, एन. 7074) ने सांगलीहून बीडला नातेवाइकांकडे निघाले होते. दरम्यान रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय मार्गावर विठ्ठलवाडीनजिक पंढरपूरला निघालेला दिंडीतील वारकरी भरधाव कारच्या आडवा आला. त्याला वाचविण्यासाठी चालकाने कार रस्त्यावरील ढिगार्यावर घातली. (Sangli)
कार ढिगार्यावरून पंधरा फूट उडून पुढे रस्त्यावर उलटली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. कारमधील पृथ्वीराज व प्रियांका हे जागीच ठार झाले. विवेक चव्हाण-पाटील,विनया चव्हाण-पाटील,विलास माने व अनिता माने हे चौघे जखमी झाले. जखमींपैकी विलास माने यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी घटनास्थळी भेट दिली. (Sangli)
हेही वाचलत का?