कोल्हापूर : पूरबाधित ऊस अजूनही शिवारातच! | पुढारी

कोल्हापूर : पूरबाधित ऊस अजूनही शिवारातच!

कोल्हापूर ; एकनाथ नाईक : साखर कारखान्यांनी प्राधान्याने पूरबाधित ऊस हंगामाच्या प्रारंभी तोडून न्यावा, असा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला होता. त्याचा काही साखर कारखान्यांना विसर पडला आहे. 23 साखर कारखान्यांकडे 19 हजार 378.34 हेक्टर क्षेत्रावर पूरबाधित उसाची नोंद झाली आहे. त्यापैकी जिल्ह्यात अजूनही 4 हजार 977.92 हेक्टर क्षेत्रातील पूरबाधित ऊस शिवारातच आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

जुलै 2021 मध्ये आलेल्या महापुराने नदी-ओढ्यांकाठच्या पिकांचे मोठे नुकसान केले. निसर्गाच्या या अवकृपेमुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बियाणे, खते, मजुरीचे पैसेदेखील ऊस पिकातून निघत नाहीत, अशी परिस्थिती आहे. शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पुढाकार घेऊन पूरबाधित उसाला प्राधान्याने तोडणी द्यावी, अशी सक्‍त सूचना केली. यासाठी प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या नेतृत्वाखाली नियंत्रण समिती नेमली आहे. रोजच्या रोज आढावा घेण्याची सूचनाही केली आहे; पण ही यंत्रणा गारठली आहे.

जिल्ह्यातील पूरबाधित ऊस नोव्हेंबरपर्यंत तुटलाच पाहिजे, असे सक्‍त आदेशही काढले; पण फेब-ुवारी उलटला तरी 4 हजार 977.92 हेक्टर क्षेत्रावरील पूरबाधित ऊस शिवारात आहे. आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, गवसे (ता. आजरा), अथणी शुगर लि., तांबाळे (ता. भुदरगड), ओलम अ‍ॅग्रा, इंडिया, लि., राजगोळी खुर्द, (ता. चंदगड) या तीन कारखान्यांनी पूरबाधित उसाची उचल केली आहे. उर्वरित साखर कारखान्यांकडे पूरबाधित उसाचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र शिल्‍लक आहे. वेळेत ऊस तुटत नसल्याने 3 हजार 244.12 हेक्टर क्षेत्रावरील उसाची अन्यत्र विल्हेवाट लावली आहे.

 

ऊस

Back to top button