पनवेल, पुढारी वृत्तसेवा : महिलेचा गळा आवळून खून करत मृतदेह गाढी नदीच्या पात्रात फेकून फरार झालेल्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलीस पथकाला यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. रियाज समद खान (वय ३६) आणि इस्माईल शेख (वय २८, दोहेही रा. मुंबई) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. महिलेने परिधान केलेल्या चप्पलाच्या आधारे पोलिसांनी या हत्याकांडाची उकल केली आहे.
दोन्ही आरोपींनी मिळून २७ वर्षीय उर्वशी सत्यनारायण वैष्णव हिचा खून करून तिचा मृतदेह पनवेल तालुक्यातील माथेरानच्या गाढी नदीच्या पुलाखाली फेकून फरार झाले होते. हा मृतदेह पनवेल पोलिसांना १४ डिसेंबर रोजी आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्या नंतर मृतदेहाची नोंद करुन हत्येचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल केल्यानंतर, मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांची शोधाशोध सुरू झाली. हा तपास पनवेलच्या पथकाने सुरू केल्यानंतर तपासला वेग आला. मात्र, प्रत्यक्षदर्शी तसेच सीसीटीव्ही घटनास्थळी नसल्याने तपासात अनेक अडथळे निर्माण होत होते.
मात्र, या पथकाने महिलेच्या मृतदेहावरील वस्तूंचे बारकाईने निरीक्षण केले. भौतिक दृष्ट्या मिळालेल्या वस्तूच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. यामध्ये पोलिसांना या महिलेच्या पायात ब्रँडेड चप्पल दिसून आली, आणि इथूनच या तपासला सुरवात झाली. या चप्पलीच्या शोध घेतला असता, पोलिसांना त्या चपल्लीच्या दुकानापर्यंत पोहचणे शक्य झाले. त्याआधारेच पोलिसांना महिलेसोबत असलेल्या अज्ञात इसमाची ओळख त्यांनी पटवून घेतली.
तसेच सीसीटीव्हीचा आधार घेतल्यानंतर हे आरोपी घणसोली परिसरात असल्याचे पोलिसांना माहीती मिळाली. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण फडतरे, संदीप गायकवाड सह अन्य पोलिसांनी घणसोली परिसरात सापळा रचून रियाज आणि इम्रानला अटक केली.