Farmer Technology Awareness
रायगड : कृषि व पूरक व्यवसायात कोकण कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान, शास्त्रज्ञ शेतकरी सुसंवादातून कृषि व मत्स्य विभागाच्या योजनांशी सांगड घालून अधिकाधिक उत्पादन कसे घेता येईल, अवेळी पडणारा पाऊस, पूरस्थिती अशा संकटामध्ये नुकसान टाळण्यासाठी करावयाच्या योजना यांची माहिती वेळोवेळी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सुसंवादाची गरज आहे. प्रत्येकाजवळ असलेल्या स्मार्ट फोनचा उपयोग करून विद्यापीठाचे संकेतस्थळ, युट्यूब चॅनल, फेसबुक पेज, अँपच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानची कास धरावी, असे आवाहन संशोधन अधिकारी डॉ. शशिकांत मेश्राम यांनी केले आहे.
डॉ .बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठांतर्गत पनवेल येथील मत्स्य उपकेंद्राद्वारे रायगड जिल्ह्यातील पेण आणि पनवेल तालुक्यातील अनुक्रमे ओढांगी, बोर्जे, वढाव, उंबर्डे आणि तारा या पाच गावांमध्ये एकाच दिवशी मत्स्यशेतीचे आधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजना बाबत माहिती, मार्गदर्शन शिबीर, चर्चा सत्र, तलावाना भेटी आदि वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी सुरुवात करण्यात आली. त्यावेळी संशोधन अधिकारी डॉ. शशिकांत मेश्राम बोलत होतीे. या कार्यक्रमांसाठी परिसरातील 100 मत्स्य शेतकरी, होतकरू व्यावसायिक तसेच कृषि विभागतील अधिकारी यांनी सहभागी नोंदविला.
संशोधन केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विवेक वर्तक यांनी पेण व पनवेल तालुक्यातील खारेपाट भागातील सर्व कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये समन्वयक म्हणून महत्वाची भूमिका पार पाडताना ठिकठिकाणच्या कार्यक्रमात नुकत्याच येऊन गेलेल्या अवकाळी पावसाने आलेल्या पूरस्थितीमध्ये पिंजरा पद्धतीने मत्स्यपालनाचे महत्त्व सोदाहरण पटवून दिले. विक्री व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने शेततळ्यात देखील पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धन आवश्यक असल्याचे सांगताना पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धनासाठी योजना शासनाच्या माध्यमातून राबविली जाणार असल्याचे सांगितले.तसेच जिवंत मत्स्य बाजारपेठ महत्व विशद करून कृषी प्रमाणे मत्स्य व्यवसाय दर्जा देण्याच्या शासनाच्या निर्णयाचे आभार मानून त्यामुळे मत्स्यव्यवसाय उच्चस्तरावर जाऊन शेतकर्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमा दरम्यान संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ .प्रविण सपकाळे यांनी मत्स्य संवर्धनामध्ये पाण्याचा दर्जा साठीचे मापदंड, त्यांची तपासणी, माती परीक्षा या बरोबर पाण्याचा दर्जा राखताना करावयाच्या उपाय योजना याबाबत मार्गदर्शन केले तसेच आपल्या शंका निरसन करण्यासाठी केव्हाही संपर्क साधावा, असे आवर्जून सांगितले. संशोधन केंद्रातील जीवशास्त्रज्ञ रविंद्र बोंद्रे यांनी शोभिवंत मत्स्य पालनामध्ये असलेल्या व्यवसाय संधी आणि त्यासाठी लागणारे तांत्रिक कौशल्य संशोधन केंद्रातून प्राप्त करून घेऊन, उपलब्ध नैसर्गिक जलसाधनसंपती, हाकेच्या अंतरावर असलेली मुंबई सारखी बाजार पेठ, विविध प्रकारच्या रंगीत माशांच्या बीजोत्पादन आणि संवर्धनासाठी असलेले जलकृषि हवामान याबाबत उपस्थित शेतकरी, महिला, विद्यार्थी यांना अवगत केले व व्यवसाय संधीचा लाभ घेण्याचं आवर्जून सांगितले.
केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ.भरत यादव यांनी विस्तृत मार्गदर्शन करताना सांगितले की डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाने कृषि, फलोत्पादन, कृषि अभियांत्रिकी, काढणी पश्चात -प्रक्रिया तंत्रज्ञान, मत्स्य शास्त्र इ विविध क्षेत्रात विकसित तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत आजकाल प्रत्येकाजवळ असलेल्या स्मार्ट फोनच्या माध्यमातून सहज पोहोचावी म्हणून यूट्यूब चॅनल, फेसबूक पेज, प्रत्येक फळपीक, विषयाप्रमाणे, कलटीवेशन काळात घ्यावयाची काळजी, पीक-पद्धतीनुसार, रोग-नियंत्रण आणि कीटक व्यवस्थापन आदि नुसार अॅप्स विकसित केली आहेत. तारा, ता पनवेल येथील कार्यक्रमात कृषि विभागाच्या योजनेंतर्गत शेतकर्यांना मृदा सर्वेक्षण अहवालांचे मान्यवरांचे हस्ते वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पेण आणि पनवेल तालुक्यातील राजन झेमसे व सहकारी (ओढांगी), रमेश ठाकूर व सहकारी (बोर्जे), विकास पाटील व गजानन वर्तक , संदीप पाटील व सहकारी (उंबर्डे), आणि दिनेश पाटील व सहकारी (तारा) या स्थानिक प्रगतीशील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते असलेल्या सहकार्यांनी स्थानिक संपर्क, नियोजन आणि कार्यक्रम प्रत्यक्षपणे पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.