

जळगाव : बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे खरीप किंवा रब्बी कोणताही हंगाम असो, शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना विशेष सतर्कता बाळगणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांनी केले आहे.
कुठलीही कंपनी बोगस आहे हे लगेच ओळखणे कठीण असते. त्यामुळे बियाणे खरेदी करताना अधिकृत परवानाधारकाकडूनच पक्के बिल घेऊन खरेदी करावी. हेच बिल शेतकऱ्यांना भविष्यात नुकसान झाल्यास दावा करताना वेळी उपयोगी पडते.
शेतकऱ्यांनी बियाण्याचे पाकीट उघडल्यानंतर त्यातील काही बियाणे बाजूला राखून ठेवावे. प्रत्येक पाकिटावर एक प्रमाणपत्र टॅग आणि मुदतीची तारीख असते, ती काळजीपूर्वक तपासावी. अशा प्रकारे पुढील तपासणीसाठी ती माहिती उपयोगी ठरते.
कुठल्याही फेरीवाल्याकडून किंवा एमआरपीपेक्षा कमी दरात बियाणे विकत घेतले जात असल्यास त्या बियाण्याबाबत शंका घ्यावी आणि संबंधित कृषी अधिकाऱ्यांना याची माहिती द्यावी. ही बियाणे री-पॅकिंग केलेली असण्याची शक्यता असते, ज्यामुळे उत्पादनात घट होऊ शकते.
बियाण्याची खरेदी करताना आपल्या जमिनीची पोत आणि उत्पादनक्षमतेनुसार योग्य कंपनीचीच बियाणे निवडावी. केवळ बाजारात मागणी आहे म्हणून कोणतेही बियाणे घेऊ नये.
बोगस बियाणे व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर एकूण १६ पथके नेमण्यात आली आहेत. ही पथके वेळोवेळी कारवाई करणार आहेत. तसेच शेतकऱ्यांसाठी 18002334000 हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आलेला असून, यावर संपर्क करून मदत घेता येईल, अशी माहिती कुर्बान तडवी यांनी दिली.