

नागोठणे: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सुकेळी खिंडीत शुक्रवार (03 एप्रिल) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ओमकार ट्रॅव्हल्सची खासगी लक्झरी बस क्र. एम पी 13 झेड पी-4545उलटून झालेल्या भीषण अपघातात पनवेलचे ॲड. नीलम वैभव विभुते (वय -40 ) आणि कामोठे येथील रहिवाशी नईम निजाम शेख (वय-33) हे दोघे ठार झाले तर अन्य 21 प्रवासी जखमी झाले.
गोव्याला सहलीकरिता निघालेल्या या बसमध्ये एकूण 45 प्रवासी होते.शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा राष्ट्रीयमहामार्गावरील नागोठणे जवळच्या सुकेळी खिंडीत बस आली असता बस चालक हेमंत कुमार पाटील (वय 36) यांचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस सुकेळी खिंडीतील चढावावरील वळणावर रस्त्याच्या डाव्या बाजूस उलटल्याने हा भिषण अपघात झाल्याचे पोलीसांनी सांगीतले.
जखमी प्रवाशांना नागोठणे प्राथमिक केंद्रात प्रथमोपचार करून पनवेल कामोठे येथील एम.जी. एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले. नागोठणे पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. सह्याद्री वन्यजीव सामाजिक संस्थेच्या रेस्क्यू टिमने हाड्रॉलिक जॅकच्या सहाय्या उलटलेली बस वर उचलून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.
पनवेलमधील विभुते कुंटूंब आणि त्यांचे स्नेही असे सर्वजण या बसमधून गोव्याला सहलीकरिता जात होते. सर्वजण गाढ झोपेत असतानाच बस उलटली. झोपेतून जागे झालेल्या प्रवाशांना काय घडले हे समजण्या आधीच ते जखमी झाले होते.
या बस अपघातात पनवेलमधील नामांकीत वकील वैभव विभूते यांच्या पत्नी ॲड. निलम वैभव विभूते यांचा जागीच मृत्यू झाल्याने विभूते कुटूंबावर दुखःचा डोंगरच कोसळला आहे. पनवेलसह रायगड जिल्ह्यातील वकील वर्गात ॲड.निलम वैभव विभूते यांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यू बाबत हळहळ व्यक्त होत आहे.