

माणगाव : कमलाकर होवाळ
माणगाव तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनी केवळ विजयीपराभूतांचे आकडेच नव्हे, तर येत्या काळातील राजकीय दिशा देखील स्पष्ट केली आहे. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील थेट लढतीत संघटनात्मक ताकद, स्थानिक नेतृत्व आणि जमिनीवरचे कार्यकर्ते हे निर्णायक घटक ठरल्याचे स्पष्टपणे दिसून आले. या निवडणुकीतून एक बाब स्पष्ट झाली आहे की, शिवसेना शिंदे गटाकडे अजूनही मजबूत कार्यकर्ता फळी आणि संघटनात्मक ताकद आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडे काही पारंपरिक गड टिकले असले तरी विस्तारासाठी संघटनात्मक बांधणीची गरज आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या यशामागे मंत्री भरत गोगावले यांचे नेतृत्वकेंद्री राजकारण आणि सूक्ष्म नियोजन हे प्रमुख कारण ठरले. “मीच उमेदवार आहे” या आवाहनातून त्यांनी निवडणूक ही प्रतिष्ठेची व अस्तित्वाची लढाई असल्याचा संदेश थेट कार्यकर्ते आणि मतदारांपर्यंत पोहोचवला. परिणामी, पक्षातील नाराजी दूर ठेवत एकसंघ फळी उभी राहिली. विशेष म्हणजे पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवून स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपली पकड कायम असल्याचे सिद्ध केले. बूथनिहाय रणनीती, कार्यकर्त्यांवर विश्वास आणि विकासाचा मुद्दा यामुळे शिवसेनेचा प्रचार प्रभावी ठरला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तळाशेत आणि मोर्बा जिल्हा परिषद मतदारसंघात विजय मिळवत आपले पारंपरिक बालेकिल्ले अबाधित ठेवले. विशेषतः मोर्बा मतदारसंघात शेकापमधून आलेल्या नेतृत्वाला सामावून घेत राजकीय वास्तव स्वीकारण्याची लवचिक भूमिका राष्ट्रवादीने दाखवली. मात्र पंचायत समितीच्या पातळीवर अपेक्षित यश न मिळाल्याने पक्षाची संघटनात्मक मर्यादा अधोरेखित झाली. प्रमुख नेत्यांचा प्रत्यक्ष प्रचार कमी पडणे, स्थानिक पातळीवर समन्वयाचा अभाव आणि कार्यकर्त्यांची मर्यादित ताकद याचा परिणाम निकालावर झाला, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
या निवडणुकीत एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला तो म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे वेगळे राजकारण. पंचायत समितीत स्थानिक प्रश्न, थेट संपर्क आणि कार्यकर्त्यांची भूमिका अधिक निर्णायक ठरते, तर जिल्हा परिषदेत पक्षाची परंपरा, नेतृत्वाची ओळख आणि राजकीय इतिहास महत्त्वाचा ठरतो.
याच कारणामुळे माणगाव पंचायत समितीवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व दिसते, तर जिल्हा परिषदेत मात्र 22 चे सत्तासंतुलन कायम राहिले आहे.
या निकालातून मतदारांनी दिलेला संदेश स्पष्ट आहे काम करणारे नेतृत्व, सतत संपर्कात असलेले कार्यकर्ते आणि विश्वासार्हता यालाच मतदार प्राधान्य देत आहेत. केवळ मोठ्या सभा, घोषणाबाजी किंवा भावनिक मुद्द्यांपेक्षा स्थानिक प्रश्नांवर सातत्याने काम करणाऱ्या नेत्यांना मतदारांनी पसंती दिली आहे.
माणगाव तालुक्यातील हे निकाल येत्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचे संकेत देणारे आहेत. शिवसेना शिंदे गटासाठी हा आत्मविश्वास वाढवणारा निकाल ठरला असून, राष्ट्रवादी काँग्रेससाठी संघटन मजबूत करण्याची ही इशारादायक घंटा मानली जात आहे.
एकूणच, ही निवडणूक सत्ता टिकवण्याची आणि अस्तित्व सिद्ध करण्याची लढाई ठरली असून, माणगाव तालुक्यातील राजकारण अधिक गतिमान व चुरशीचे होण्याचे संकेत या निकालातून मिळत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होताच माणगाव तालुक्यातील राजकीय चित्र स्पष्ट झाले असून, या निकालांनी अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचा मतदारसंघ आणि शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या निजामपूर व गोरेगाव जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने आपले वर्चस्व कायम राखले, तर तळाशेत व मोर्बा या दोन जिल्हा परिषद गटांत राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पकड मजबूत ठेवली आहे.
माणगाव पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने मोठी मुसंडी मारत एकूण पाच जागांवर विजय मिळवला. गोरेगाव गटातील दोन, निजामपूर गटातील दोन तसेच मोर्बा गटातील मांजरवणे गणातील एक उमेदवार शिवसेनेचे निवडून आल्याने माणगाव पंचायत समितीवर शिवसेना शिंदे गटाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. त्यामुळे पंचायत समितीचे सभापतीपद शिवसेनेकडे जाणे जवळपास निश्चित मानले जात आहे. याउलट, मोर्बा पंचायत समिती गटात एक आणि तळाशेत गटात दोन सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले असले तरी एकूण संख्याबळाच्या तुलनेत त्याचा फारसा परिणाम सत्तास्थापनेवर होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.2017 प्रमाणेच यावेळीही माणगाव पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात राहिली, तर जिल्हा परिषदेत मात्र सत्तासंतुलनाचे चित्र कायम राहिले आहे. त्यामुळे येत्या काळात तालुक्यातील राजकारण अधिक चुरशीचे होण्याची चिन्हे दिसत आहेत.
माणगाव तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटांपैकी निजामपूर व गोरेगाव या दोन गटांवर शिवसेनेने आपला बालेकिल्ला राखला, तर तळाशेत व मोर्बा या दोन गटांत राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व कायम ठेवले. विशेष म्हणजे तळाशेत हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो आणि यावेळीही तेथे राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला. मोर्बा जिल्हा परिषद मतदारसंघात मागील निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार विजयी झाला होता. मात्र यावेळी शेकापचे नेते अस्लमभाई राऊत यांनी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीच्या तिकिटावर ते विजयी झाले, त्यामुळे हा गटही राष्ट्रवादीकडे गेला.
या निवडणुकीत मंत्री भरत गोगावले यांनी “मीच उमेदवार आहे, असे समजून मतदान करा” असे भावनिक व राजकीय आवाहन करत स्वतः निजामपूर मतदारसंघात तळ ठोकला होता. पक्षातील नाराज कार्यकर्त्यांना विश्वासात घेत मजबूत संघटन उभे करत विकासाच्या मुद्द्यावर केंद्रित प्रचार केल्याचा फायदा शिवसेनेला झाला. प्रचारादरम्यान त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवत, बूथनिहाय नियोजन आणि कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यावर भर दिला. याचे स्पष्ट प्रतिबिंब निकालात दिसून आले.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कै. अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील निधनामुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना प्रत्यक्ष प्रचारासाठी वेळ मिळू शकला नाही. मात्र पक्षाने श्रद्धांजली सभा, छोट्या बैठका आणि घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद असा साधा पण भावनिक प्रचाराचा मार्ग स्वीकारला. मोठ्या रॅली, घोषणाबाजी न करता कार्यकर्त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत आशीर्वाद मागितले. तरीही अनेक ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांची कमतरता आणि संघटनात्मक मर्यादा राष्ट्रवादीला भोवली.