महाड : चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिनानिमित्त हजारो भीम अनुयायींची उपस्थिती

महाड : चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिनानिमित्त हजारो भीम अनुयायींची उपस्थिती
Published on
Updated on

महाड, पुढारी वृत्तसेवा : समाजातील  जातीयवादाची दरी संपुष्टात यावी, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीनिमित्त आज (रविवार) चवदार तळे सत्याग्रहाचा ९५ वा वर्धापन दिन महाडमध्ये साजरा केला जात आहे. यानिमित्त १९ मार्चपासून हजारो अनुयायी महाडमध्ये दाखल झाले आहेत.

आज सकाळपासूनच चवदार तळ्यातील पाणी प्राशन करण्यासाठी तसेच चवदार तळे व क्रांती स्तंभावरील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी हजारो भीमसैनिक, आंबेडकर प्रेमी, राजकीय नेते, पदाधिकारी यांनी गर्दी केली होती. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज सकाळी चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.

यावेळी आदिती तटकरे म्हणाल्या की, "२० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळे येथे पाण्याचा सत्याग्रह केला. तो केवळ अस्पृश्यांना पिण्याचे पाणी खुले करण्यासाठी दिलेला लढा नव्हता. तर त्यांच्या मुलभूत न्याय हक्कासाठी दिलेला लढा होता. जुलै महिन्यात जो महाप्रलय आला होता, त्यातून चवदार तळेही वाचले नाही. चवदार तळ्याची साफसफाई करण्यासाठी स्थानिक प्रशासन, महाड नगरपालिका व ठाणे महानगरपालिकेचे मोठे योगदान होते. चवदार तळ्यातील पाणी शुद्धीकरणासाठी जी यंत्रणा बसवण्यात आली आहे, असे सांगून
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अधिकाधिक प्रसारीत करण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जाईल, असेही आश्वासन तटकरे यांनी दिले.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी पुकारलेला लढा हा माणुसकीहिन समाज व्यवस्थेविरोधातील लढा होता. या लढ्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संरक्षणासाठी महाडमधील काही सवर्ण पुढे आले आणि त्यांनी आजूबाजूच्या परिसरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर हल्ला करण्यासाठी जे सनातनी आले होते. त्यांना परतवून लावले, हा भारताच्या इतिहासातील टर्निग पॉईंट ठरला होता. अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवला पाहिजे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी सांगितले. अस्पृश्य समाजाला समाज व्यवस्थेमध्ये पाणीही पिऊ द्यायचे नाही, या माणुसकीहिन संस्कृती व्यवस्थेविरोधात उभारलेला हा लढा होता. माणसाला माणूस म्हणून जगता यायला हवे. त्याला पाण्यापासून वंचित ठेवता येणार नाही, हा संदेश चवदार तळे सत्याग्रहातून संपूर्ण जगाला दिला . म्हणून चवदार तळे हे ऊर्जास्तोत्र आहे, असेही आव्हाड यांनी सांगितले.

दरम्यान, चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिनी महाड मध्ये हजारोंच्या संख्येने दाखल होणार्‍या आंबेडकर अनुयायींसाठी चवदार तळे विचार मंच महाड, पोस्ट कर्मचारी संघटना तसेच विविध शासकिय सामाजिक संघटनांच्या वतीने अल्पोपहार, जेवण, पाणी याची व्यवस्था करण्यात आली होती.

हेही वाचलंत का ? 

पाहा व्हिडिओ : दुष्काळ ते 300 एकर ऊस लागवड करण्याऱ्या हिंगणगावाची गोष्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news