

नेरळ : कर्जत-कल्याण या राज्यमार्गाचे चौपदरीकरणाचे काम हे गेल्या 10 वर्षापासून सुरू करून देखील काही ठिकाणी अर्धवटस्थितीत आहे. रखडलेले कामा पहाता व वारंवार तक्रारी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने अर्धवट पुलाच्या कामामुळे 1 मार्च रोजी एका दुचाकीस्वराचा पुलाखाली नाल्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या तरूणाच्या मृत्यूमुळे नागरिकांमधून प्रशासनाच्या संबंधित विभाग व ठेकेदारा विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या दुचाकीतील तरूणाच्या अपघाती मृत्यूला नेमके जबाबदार कोण? प्रशासन की ठेका प्राप्त ठेकेदार असा संत सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
कर्जत - नेरळ - कल्याण या भागातील शहरी भागांना जोडणारा राज्य मार्ग क्र. 76 या मार्गाची कर्जत-नेरळ व रायगड जिल्हयाची शेवटची वागणी डोणे गेट असलेल्या हद्दी पर्यंत गेल्या अनेक वर्षांपासून झालेली दुरवस्था व अर्धवट व रखडलेल्या कामांच्या स्थितीमुळे हा राज्यमार्ग नागरिकांच्या प्रवासाठी जीवघेणा ठरत आहे. या राज्य मार्गाचे काम हे कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 2016 मध्ये ठेका प्राप्त ठेकेदार पी. पी. खारपाटील यांच्या मार्फत काँक्रीटीकरणाचे काम तर काही
ठिकाणी डांबरी करणाचे काम करण्यात आले आहे. मात्र हे काम सुरू करून तब्बल 10 वर्षे उलटूनही या राज्य मार्गावरील कामे ही काही ठिकाणी अर्धवट तर रखडलेल्या अवस्थेत तर काही ठिकाणी रूंदीकरणासंदर्भात अपूर्ण आहेत. त्या मध्येच नेरळमधील पोलीस ठाणे येथील ब्रिटिश कालीन असलेल्या पुलाशेजारी एक पुलाचे काम केले मात्र त्या ठिकाणी सुरक्षेचा असेलेला अभाव तर नेरळ वाल्मिकी नगर येथील निकामी झालेला जुना ब्रिटिश कालीन बंद केलेला पुल व त्या ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेला अरुंद पुलाचे कामामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. तर नेरळ पोलीस ठाणे येथील जुन्या व नव्या पुलावरील असलेला सुरक्षा संदर्भातील अभावामुळे या पुलावरून नेरळ मोहाचीवाडी येथील राहाणार तरूण चंद्रकांत ऐनकर हा 1 मार्च 2026 रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकी वरून कर्जत बाजूकडून नेरळ मोहाचीवाडी येथे जात असताना, या पुलाच्या कठड्याला जोरदार ठोकर बसल्याने व तो नाल्यात पडून त्याचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.
या अपघातामध्ये तरूण चंद्रकांत ऐनकर याचा मृत्यू झाला आहे. या अपघाती मृत्यूच्या घटनेमुळे नागरिकांमधून प्रशासनाच्या संबंधित विभाग व ठेकेदारा विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या दुचाकीतील तरूणाच्या अपघाली मृत्यूला नेमके जबादार कोण? प्रशासन की ठेकेदार असा संत सवाल देखील उपस्थित केला जात आहे.सात-आठ वर्षांत या राज्य मार्गावरील झालेल्या अपघातांप्रकरणी संबंधित सार्वजनिक बांधकांम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ही नागरिकांनी केली आहे.
कर्जत - कल्याण राज्यमार्ग क्र. 76 वरील कर्जत ते वागणी डोणे गेट असा संपूर्ण रस्ता हा कार्यआदेश व इस्टिमेंट प्रमाणे सिमेंट काँक्रीटीकरणाचा करण्याचा असताना, मात्र सदर राज्यमार्गावरील काम हे काही ठिकाणी डांबरीकरण तर काँक्रीटीकरणाचे का? तसेच अनेक ठिकाणी पुलांची कामे अर्धवट स्थितीत? असे प्रश्न उपस्थित होत असल्याने व 10 वर्षांत काम पूर्ण झाले नसल्याने, संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून संबंधित ठेकेदाराची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी. नाहीतर संबंधित बांधकाम विभाग उरण व संबंधीत ठेकेदाराविरोधात मोठे जनआंदोलन उभारून रास्ता रोको केला जाईल.
गोरख शेप, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय मानवाधिकार, रायगड