

जयंत धुळप, रायगड
दर्यासारंग सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी स्थापन केलेल्या आणि रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग नगरीच्या नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्ष निवडणूकीत विजयी झालेल्या सर्वात तरुण नगराध्यक्षा कु.अक्षया नमिता प्रशांत नाईक यांच्या रुपाने अलिबाग नगरीत आता नवे विकासपर्व सुरु होत आहे. तरुण वयातच या महत्त्वाच्या पदावर विराजमान होऊन त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशात नावलौकीक असलेल्या अलिबागला राज्याच्या राजकारणात एक आगळा आयाम मिळवून दिला आहे.
अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्या नंतर अक्षया नमिता प्रशांत नाईक या राज्यातील सर्वात कमी वयाच्या नगराध्यक्षा ठरल्या आहेत. हे यश केवळ माझे वैयक्तिक नसून, ते अलिबागच्या तरुणाईच्या आणि महिलांच्या नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करणारे आणि शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंतभाई पाटील, वडिल विद्यमान नगरसेवक व माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक आणि सर्व कार्यकर्त्यांचे आहे. माझा विजय हा सर्व कार्यकर्त्यांचा विजय असल्याचे त्या अत्यंत नम्रपणे सांगतात.
अलिबागचे नगराध्यक्ष आणि नाईक कुटूंबिय हे गेल्या अनेक वर्षांचे एक अतूट नाते असून याच नाईक नगराध्यक्ष परंपरेतील कु.अक्षया नमिता प्रशांत नाईक या सातव्या नगराध्यक्ष आहेत. हा देखील एक राजकीय क्षेत्रातील विक्रम मानला जात आहे. नाईक नगराध्यक्ष परंपरेची मुहूर्तमेठ रावसाहेब रामराव नथोबा नाईक यांनी अलिबागकर नागरीकांच्या सहयोगाने रोवली. त्यानंतर अनंतराव नथोबा नाईक नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर अलिबागच्या विकासाच्या नव्या पर्वाचा प्रारंभ झाला. त्यानंतर सुनीता मधुसुदन नाईक या नगराध्यक्षा झाल्या आणि त्यांनी ही परंपरा पूढे अबाधीत राखली. त्यांच्यानंतर प्रशांत मधुसुदन नाईक हे अलिबागचे नगराध्यक्ष झाले आणि अलिबागनगरीला आधूनिक विकासाची झालर लाभली.
निवडणूकीच्या वेळी राजकारण त्यानंतर सर्व एक म्हणजे अलिबागकर नागरिक अशी त्यांची भूमिका राहील्याने त्याच बरोबर त्याच भूमिके प्रमाणे त्यांची कृती राहील्याने ते केवळ शेकापमध्येच नव्हे तर सर्व राजकीय पक्षांमध्ये लोकप्रिय झाले. प्रशांत नाईक यांचीच भूमिका स्विकारुन कार्यरत राहीलेल्या त्यांच्या पत्नी नमिता प्रशांत नाईक या त्यांच्यानंतर नगराध्यक्षा झाल्या आणि अलिबागचा विकास अधिक गतीमान झाला. त्यानंतर पून्हा प्रशांत नाईक हे नगराध्यक्ष झाले आणि अलिबागच्या रस्ते विकासापासून विविध विकास योजना मार्गस्थ झाल्या. नगराध्यक्षपदाची ही परंपरा अबाधीत राखत आता अक्षया नमिता प्रशांत नाईक या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्याने तीच अखंड विकास परंपरा पूढे अधिक प्रभावी करण्याचा मनोदय नवनिर्वाचीत नगराध्यक्षा अक्षया नमिता प्रशांत नाईक यांचा आहे.
नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अक्षया नाईक यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाला आपले सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. निवडणुकीनंतर त्यांनी जनतेसमोर आपले व्हिजन स्पष्ट केले आहे. त्यामध्ये चार महत्वाचे मुद्दे आहेत.
अलिबाग शहराचा पाणीपुरवठा सुयोग्य करण्यास त्यांनी प्रथम प्राधान्य दिले आहे.अलिबाग शहराची पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी सांगीतले. स्वच्छता व आरोग्य या विषयावर लक्ष केंद्रीत करुन शहर स्वच्छ ठेवणे आणि नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवणे.रस्ते व मूलभूत सुविधा विसांतर्गत शहरातील रस्ते आणि नागरिकांसाठीच्या मूलभूत सुविधांची स्थिती सुधारण्याचे त्यांचे नियोजन आहे.दरम्यान गेल्या तीन वर्षापासून नगरपरिषदेची निवडणूक न झाल्याने अलिबागची विकासकामांमध्ये जी सात ते आठ वर्षे मागे पडली.तो अनुशेष जलद गतीने भरून काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
अक्षया नाईक यांच्या रूपाने अलिबागला एक उत्साही, सुशिक्षित आणि गतिमान नेतृत्व मिळाले आहे. या तरुण नेतृत्वाकडून अलिबागकरांना शहर विकासाच्या अनेक महत्त्वाकांक्षी अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्याकरिता सतत प्रयत्नशिल राहाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.