ओतूर : पुढारी वृत्तसेवा: श्री क्षेत्र ओतूर ते श्री क्षेत्र पंढरपूर श्री बाबाजी चैतन्य महाराजांच्या दिमाखदार पालखी सोहळ्याचे प्रस्थान हरिनामाच्या व टाळ-मृदंगाच्या गजरात करण्यात आले. अत्यंत भक्तिमय वातावरणाने अवघे ओतूर दुमदुमले. शनिवारी (दि. 18) पांढरी मारुती मंदिरात मुक्काम करून रविवारी (दि. 19) या पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले.
तत्पूर्वी शंकर भगवंत पाटील डुंबरे या उभयतांच्या हस्ते श्रींची पूजा व अभिषेक करण्यात आला, अशी माहिती दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष आत्माराम गाढवे व सचिव अनिल तांबे यांनी दिली. पालखी रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान प्रगतिशील शेतकरी शरद अर्जुन गाढवे व गोरख अर्जुन गाढवे यांच्या राजा-हौशा बैलजोडीला मिळाला.
गेली दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावाने वारीला खंड पडला होता; मात्र यावर्षी भक्तिमय वातावरणात निघालेला पालखी सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. चैतन्य विद्यालयाच्या मुलींचे लेझीम पथक, झेंडा पथक व हजारोंच्या संख्येतील भाविक भक्त ग्रामस्थांनी पालखी प्रस्थानावेळी हजेरी लावल्याने गावाला यात्रेचे स्वरूप आले.
हा सोहळा आळे, आळकुटी, वडझिरे, पारनेर, पिंपळनेर, ढवळगाव, बेलवंडी, श्रीगोंदा, चांडगाव, जलालपूर, सिद्धटेक, बारडगाव, कोर्टी, विट, कारखाना, टेंभुर्णी, वरवडे, आष्टी या मार्गाने जाणार असून गुरुवारी (दि. 7 जुलै) पंढरपूर येथे पोहोचणार आहे. 65 एकरच्या शेजारी नदी पलीकडे बोराटे मळा मुक्कामाचे ठिकाण आहे. बुधवारी (दि. 27 जुलै) ओतूर येथे बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे पुनरागमन होणार असल्याचे ह.भ.प. शांताराम महाराज वाकर यांनी सांगितले.
हेही वाचा