पुणे : पुढारी वृत्तसेवा: संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री निर्मला गोगटे आणि शास्त्रीय गायिका डॉ. रेवा नातू यांना महापालिकेच्या वतीने बालगंधर्व पुरस्कार वर्षभरापूर्वी जाहीर झाला खरा; पण एक वर्ष उलटूनही पुरस्काराचे वितरण झालेले नाही.
बालगंधर्व पुरस्कार प्रदान कार्यक्रम केव्हा? हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. संगीत रंगभूमीवरील नटसम्राट बालगंधर्व यांच्या जन्मदिनानिमित्त पुणे महापालिकेतर्फे दरवर्षी एका ज्येष्ठ कलाकारास बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्याचबरोबरीने नाट्य क्षेत्रातील पाच कलाकारांचा सत्कार केला जातो.
कोरोनामुळे 2020 आणि 2021 या दोन वर्षांचे पुरस्कार निर्मला गोगटे आणि डॉ. रेवा नातू यांना देण्याची घोषणा गेल्या वर्षी तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली होती. त्याला आता वर्ष झाले असून, रविवारी (26 जून) बालगंधर्व यांचा जन्म दिन आणि बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन साजरा होत असताना हे पुरस्कार केव्हा प्रदान केले जाणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेची मुदत संपुष्टात आली असून, महापालिका आयुक्त सध्या प्रशासक म्हणून काम पाहत आहेत.
पुनर्विकासाचा पुनर्आराखडा महिनाभरात…
बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा पुनर्आराखडा तयार करण्याचे काम महिनाभरात पूर्ण होईल. आधीच्या नियोजित पुनर्विकासाच्या आराखड्यात बदल करून पुनर्आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याविषयी महापालिकेच्या भवन विभागाच्या प्रमुख हर्षदा शिंदे म्हणाल्या, 'बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाच्या आराखड्यात काही दुरुस्त्या करण्यात येत आहेत. हे बदल करून पुनर्आराखडा महिनाभरात पूर्ण होईल. आधीच्या आराखड्यात काही बदल करून त्याचा पुनर्आराखडा तयार करावा असे ठरले.'
मला बालगंधर्व पुरस्कार गेल्या वर्षी जाहीर झाला होता. मात्र, पुरस्कार प्रदान कार्यक्रम केव्हा होणार, याची मला कल्पना नाही.
– डॉ. रेवा नातू, शास्त्रीय गायिका
हेही वाचा