उंडवडी : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील काही भागात जोरदार तर काही भागात कमी पाऊस झाला आहे. काही ठिकाणी अजूनही पावसाने हुलकावणी दिली आहे. परिणामी जिरायती भागात शेतकर्यांनी खरिपाच्या पेरण्या पुढे ढकलल्या आहेत.
उंडवडी सुपे परिसरात मध्यंतरी पाऊस झाला. परंतु पेरण्यांसाठी अजून मोठ्या पावसाची गरज आहे. दोन-तीन दिवस झाले वातावरणात प्रचंड उष्णता असून आभाळही भरपूर येत आहे. मात्र पाऊस हुलकावणी देत आहे. मध्यंतरी झालेल्या दोन पावसांचे पाणी जमिनीतच मुरून गेले. परिणामी सलग दोन- तीन मोठे पाऊस झाले तरच या भागातील पेरण्या होतील.
जिरायती भागात मोठा पाऊस होऊन ओढे-नाले भरतील तेव्हाच येथील शेतकरी पेरण्या करतील. दरवर्षी थोड्या पावसावर खरीप हंगामातील पेरण्या शेतकरी करतात. मात्र नंतर पुरेशा पावसाअभावी दुबार पेरण्या कराव्या लागतात. त्यामुळे यंदा पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करणार नसल्याचे शेतकरी अशोक गवळी यांनी सांगितले.