

बारामती : पुढारी वृत्तसेवा: महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले. या योजनेविषयी माहिती देताना तांबे म्हणाले, योजनेअंतर्गत आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, लिंबू, संत्रा, मोसंबी, सीताफळ, नारळ, आवळा, अंजीर, जांभुळ, चिंच, फणस, शेवगा, काजू, ड्रॅगन फ्रूट, अॅव्हाकॅडो, केळी, द्राक्ष या पिकांचा समावेश असून गुलाब, मोगरा व निशीगंध या फुलपिकांसाठीसुद्धा महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लागवडीस परवानगी देण्यात आलेली आहे.
वैयक्तिक बांधावरील फळपिके लागवडीसाठी हेक्टरी 20 रोपे या मर्यादेत ही योजना राबविण्यात येते. क्षेत्र परिस्थितीनुसार लागवडीचे अंतर कमी-जास्त करण्यास परवानगी आहे. परंतु देय अनुदान फळपीक लागवडीचे निकष, विद्यापीठ शिफारशीनुसार अंतर मर्यादेतच राहील. अतिरिक्त कलमे, रोपे यांचे अनुदान देय राहणार नाही. लागवड वर्षासह सलग 3 वर्षात मंजूर अंदाजपत्रकानुसार अनुदान देय राहील.
दुसर्या व तिसर्या वर्षी बागायती फळपिकांकरिता जे लाभार्थी 90 टक्के फळझाडे जिवंत ठेवतील व कोरडवाहू फळपिकाची 75 टक्के फळझाडे जिवंत ठेवतील अशाच लाभार्थ्यांना दुसर्या व तिसर्या वर्षाचे अनुदान देय राहणार आहे. सलग क्षेत्रावर फळबाग लागवड व बांधावर फळझाडे लागवडसाठी शेतकर्यांनी गावचे कृषी सहाय्यक यांच्याकडे अर्ज करावा, असे आवाहन तांबे यांनी केले आहे.
लाभार्थी निकष
कमीत कमी 0.05 हेक्टर व जास्तीत जास्त 2.00 हेक्टर प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा आहे. इच्छुक लाभधारकाच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. सातबारास कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती, अल्प, अत्यल्प भूधारक, महिला लाभार्थी व दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थी ग्रामपंचायतीचा जॉबकार्डधारक असावा.
हेही वाचा