

श्रीकांत बोरावके/नरेंद्र साठे
आळंदी :
चला हो, पंढरी जाऊ,
जिवाच्या जिवलगा पाहू ।
भीवरे स्नान करुनीया,
संत-पद-धूळ शिरि लावू ॥धृ0॥
बोधरूप तुळशीच्या माळी,
श्रवण-मणि चंदनहि भाळी ।
करू मननाचिया चिपळी,
निजध्यासे हरी गाऊ ॥1॥
'ज्ञानोबा-माउली'च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने मंगळवारी (दि. 21) रात्री साडेआठच्या सुमारास देऊळवाड्यातून पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. यंदा प्रस्थानाला सुमारे तीन तास विलंब झाल्याचे दिसून आले. या वेळी अवघी अलंकापुरी 'माउली-माउली'च्या गजराने दुमदुमून गेली होती. बुधवारी (दि. 22) पहाटे माउलींची पालखी पुण्याच्या दिशेने प्रस्थान करणार आहे.
माउलींच्या समाधी मंदिरात पहाटे चार वाजता घंटानादाने या वैभवी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर काकड आरती झाली, पहाटे सव्वाचार ते साडेपाच या वेळेत माउलींना पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुधारतीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सकाळी नऊला माउलींच्या समाधीच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. दुपारी 12 वाजेच्या सुमारास माउलींना महानैवेद्य दाखविण्यासाठी दर्शनबारी बंद करण्यात आली. त्यानंतर गाभारा स्वच्छ करून समाधीस पाणी घालण्यात आले. दुपारी साडेबारा ते दोन या कालावधीत पुन्हा भाविकांना दर्शन खुले करण्यात आले. त्यानंतर प्रस्थानाच्या प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात झाली.
महाद्वार, हनुमान आणि पान दरवाजा बंद करून पोलिसांनी मंदिर परिसर रिकामा केला. दुपारी अडीच वाजता मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून आत सोडण्यास सुरुवात करण्यात आली. साडेसहा वाजता ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या मानाच्या हिरा व मोती आश्वांचा देऊळवाड्यात प्रवेश झाला. साडेसात वाजता मानपानाच्या कार्यक्रमानंतर प्रस्थानापूर्वी समाधी मंदिरात गुरू हैबतबाबांच्या व संस्थानच्या वतीने सायंकाळी पावणेआठ वाजता माउलींची आरती घेण्यात आली.
सायंकाळी साडेआठच्या सुमारास माउलींच्या पालखीने वीणामंडपातून प्रस्थान ठेवले. या वेळी अवघा देऊळवाडा 'माउली-माउली'च्या जयघोषाने दुमदुमून गेला. मंदिरप्रदक्षिणा घालून पालखी नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. नगरप्रदक्षिणा घालून रात्री उशिरा पालखी माउलींच्या गांधीवाडा, दर्शनबारी मंडपात विसावली. बुधवारी पहाटे पालखी आळंदीवरून पुण्याच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. माउलींच्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून आणि परराज्यातून हजारो भाविक अंलकापुरीत दाखल झाले होते.
ऊन-सावलीच्या खेळात आणि टाळ-मृदंगांच्या गजरात अवघी अलंकापुरी दुमदुमून गेली होती. इंद्रायणीतीरावर वैष्णवांच्या मांदियाळीचा हा अवीट सोहळा भाविकांना अनुभवायला मिळत होता. महिला भाविकांची मोठी संख्या या वर्षी सोहळ्यात दिसून येत होती.
मानाच्या 47 दिंड्या देऊळवाडा परिसरात दाखल झाल्यानंतर 'ज्ञानोबा-माउली'च्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने अवघा मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. पांढरेशुभ— बंडी-धोतर आणि डोक्यावर पांढरी टोपी, हातात टाळ, पतका घेऊन असलेला वारकरी आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी यांचे लयबद्ध संचलन, देऊळवाड्यात या वारकर्यांनी उभारलेले मनोरे, महिलांच्या फुगड्या, फेर आणि टिपेला पोहचलेल्या टाळ-मृदंगांच्या गजरात देहभान हरपून नाचणारे टाळकरी यामुळे हा सोहळा अधिकच रंगला.