

नारायणगाव : येडगाव धरणाच्या कालव्याचे अस्तरीकरण निघाल्याने कालव्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. कालव्याचे अस्तरीकरण उन्हाळ्यापूर्वी करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. (Latest Pune News)
येडगाव धरणाचा कालवा जुन्नर तालुक्याच्या पुढे पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या परिसरापर्यंत जात असून या कालव्याची लांबी 249 किलोमीटर असून हा कालवा सन 1980 मध्ये झाला आहे. कालवा झाल्यापासून आजवर या कालव्याची एकत्रीत डागडुजी झाली नाही. त्यामुळे कालव्यातून पाणी सोडल्यावर पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे धरणातून जास्त दाबाने पाणी सोडले तरी कालव्यातून पाणी गळती होत असल्याने शेवटच्या टोकापर्यंत पाणी वेळेवर पोहचत नाही.
कालव्याच्या गळतीच्या पाण्यामुळे आमच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, आम्हाला भरपाई मिळावी, अशी ओरड नुकसान होणारे शेतकरी करत असतात. परंतु त्यांच्या नुकसानीची भरपाई जलसंपदा विभागाकडून अद्याप मिळालेली नाही. दरम्यान जलसंपदा विभागाने या कालव्याची दुरुस्ती व अस्तरीकरण लवकर करावे, अशी मागणी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महाराष्ट्र राज्य शेतकरी संघर्ष संघटनेचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष तानाजी तांबे यांनी केली आहे.
या संदर्भात जलसंपदा विभागाच्या नारायणगाव कार्यालयाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर यांच्याशी भमणध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले, हा कालवा तातडीने 60 किलोमीटरपर्यंत तत्काळ दुरुस्त करावा, असा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविलेला आहे. तो प्रस्ताव मंजूर झाल्यावर तत्काळ या कालव्याची दुरुस्ती करण्यात येईल.
येडगाव कालव्याचे अस्तरीकरण निखळले शेतकऱ्यांच्या पिकात पाणी घुसून होतेय नुकसान दुरुस्तीची मागणी