

पुणे: राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमुक्ती योजनेत नियमित कर्ज भरणा-या शेतकऱ्यांना दोन लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे. त्याच बरोबर वर्ष २०१७ आणि वर्ष २०१९ च्या कर्जमाफीत राहिलेल्या थकबाकीदार कर्जदार शेतकऱ्यांचाही समावेश करावा या महत्वपूर्ण मागण्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या दोन दिवशीय बैठकीत विविध मागण्यांचे एकूण 12 ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
भारत-अमेरिका मुक्त करार करु नये, शेतीपंपास विद्युत कनेक्शन देताना सोलर पंपाची वीज नेटमीटरिंग करुन 12 तास वीज दयावी, कर्जमाफी योजनेत द्राक्ष, ग्रीन हाऊस, शेडनेटच्या शेतकऱ्यांचे 10 लाखांपर्यंत थकीत कर्जही माफ करण्याचा ठराव संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु शेट्टी यांच्या अध्यक्षतेखालील किवळे (पुणे) येथील बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्यावतीने दि. 10 व 11 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीस राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवरील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वाभिमानीच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रकाश बालवडकर
संघटनेला अधिक मजबूत करण्यासाठी काही नवीन जबाबदाऱ्या आणि पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी नंदुरबार जिल्ह्यातील घनशाम चौधरी यांची तर स्वाभिमानी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी पुणे येथील प्रकाश बालवडकर यांची नियुक्ती करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी मयूर बोर्डे व स्वाभिमानी पक्षाच्या युवा आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी सुर्यभान जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.
स्वाभिमानीच्या बैठकीतील अन्य महत्वाचे ठराव
गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, शेतीपंपास विद्युत कनेक्शन देताना सोलर पंपाची वीज नेटमीटरिंग करुन 12 तास वीज दया, द्राक्ष, ग्रीन हाऊस, शेडनेटच्या शेतकऱ्यांचे 10 लाखांपर्यंत थकीत कर्जही माफ करा, पिक कर्ज वगळता इतर खावटी, किसान सहाय्य, आकस्मित या मध्यम मुदत कर्जांना १२ ते १३ टक्क्यांऐवजी ७ टक्के दराने कर्ज दया, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत अपघात विम्याची रक्कम दोन लाखावरून पाच लाख करावी. तसेच शेतात काम करताना शेतकरी, शेतमजूर यांना सर्पदंश झाल्यास त्यांना २५ लाख रूपये मदत देण्यात यावी, शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करा, केंद्राने साखर आयात करण्याचा निर्णय घेऊ नये, हळद या पिकास वायदेबाजारातून वगळण्यात यावे आदींचा समावेश आहे.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेहमीच रस्त्यावरची लढाई लढली आहे. आगामी काळातही कोणत्याही सत्तेच्या आमिषाला बळी न पडता संघटना केवळ आणि केवळ बळीराजाच्या हितासाठी कटिबद्ध राहील. सर्व कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून आगामी काळात पक्षाच्या ध्येयधोरणांचा प्रचार गावागावांत करावा.
राजु शेट्टी, संस्थापक अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना