

पुणे: राज्य सरकारच्यावतीने सन २०२४ करिताचे राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांमध्ये पुणे जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांना विविध पुरस्कार जाहिर झाले आहेत. वसंतराव नाईक कृषिभूषण या पुरस्कार दौंड तालुक्यातील समीर डोंबे (खोर) यांना जाहिर झाला आहे. तर छाया पवार (कुरणेवाडी-बारामती) या जिजामाता कृषिभूषण पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार पुणे जिल्ह्यातील तांदुळवाडी-बारामती येथील योगेश धनगर (नालांदे) यांना जाहिर झाला आहे. उद्यानपंडित पुरस्कारासाठी अमर भोसले (सराटी-इंदापूर) यांची निवड झाली आहे.
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) संतोष धुमाळ (पेठ-आंबेगांव) यांना जाहिर झाला आहे. तर हाच पुरस्कार (आदिवासी गट) शंकर केंगले (डोण-तिरपड,ता.आंबेगांव) यांची निवड झाली आहे. तर कृषि आयुक्तालय स्तरावर अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार कृषि आयुक्तालय स्तरावर (पुणे) कृषी आयुक्तालयातील कृषि उपसंचालक (विस्तार) मनोहर मुंढे यांना जाहिर झाला आहे.
राज्यात कृषि, कृषि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ति, संस्थांना विविध पुरस्कार देऊन राज्य सरकारकडून सन्मानित करण्यात येते. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समिती बैठकीत पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली असून शासनाने त्यास मान्यता दिली आहे. राज्यातील कृषी क्षेत्रात नविन तंत्रज्ञानाचा स्वीकार, उत्पादनवाढ, शाश्वत शेती, सेंद्रिय शेती, फलोत्पादन आणि कृषी विस्तार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतात.
'हरितक्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या कृषी दिनाचे औचित्य साधून बुधवार दिनांक १ जुलै २०२६ रोजी मुंबई येथे पुरस्कार वितरणाचा गौरवशाली सोहळा संपन्न होणार आहे. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते कृषि पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल.
दत्तात्रय भरणे , कृषी मंत्री