

सीताराम लांडगे
लोणी काळभोर: पुण्याच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी हवेली तालुक्यातील गोऱ्हे परिसरात मोठ्या प्रमाणात डोंगरफोड, गौणखनिज उत्खनन आणि हजारो वृक्षांची कत्तल सुरू असल्याचे स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींकडून आरोप करण्यात आले आहेत. या घडामोडींमुळे ऐतिहासिक वारसा तसेच पर्यावरणीय संतुलन धोक्यात आल्याची चिंता व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, डोंगरांची नैसर्गिक रचना बदलली जात असून, जैवविविधतेवर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याचा आरोपही समोर आला आहे; ज्यामुळे मातीधूप, जलस्रोतांवर ताण आणि हवामानातील असंतुलन निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या प्रकरणात प्रशासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित विभागांकडून तातडीने आणि ठोस कारवाई दिसून येत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महसूल विभागाच्या कार्यपद्धतीबाबत ‘ही निष्क्रियता की जाणीवपूर्वक दुर्लक्ष?’ असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पर्यावरण तसेच पुरातत्व विभाग यांच्यावरही टीका होत असून, ऐतिहासिक वारसासंवर्धन आणि पर्यावरणसंरक्षणाच्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडल्या जात नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी ‘सिंहगड वाचवा’ ही मागणी अधिक तीव केली आहे.
संबंधित प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी आणि आवश्यक ती तातडीची पावले उचलावीत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा व्यक्त होत आहे.