

माणिक पवार
नसरापूर: शिवरे (ता. भोर) परिसरातील विविध शासकीय कामांसाठी वारंवार जमिनींचे अधिग्रहण केले जाते. यामुळे गावातील जमिनीचे क्षेत्र कमी होऊन अनेक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यावर शासनाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे शिवरेकरांत अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे बळजबरीने जमिनी अधिग्रहण केल्यास सर्व शासकीय योजनावर बहिष्कार घालण्याचा पवित्रा शिवरे ग्रामस्थांनी घेतला आहे.
जाणकाराच्या मते काद्यानुसार पहिली जमीन संपादित केली म्हणून दुसरी घेतली जाऊ शकत नाही, असा थेट कायदा नाही. परिणामी शिवरेमध्ये वारंवार भूसंपादनामुळे गावाचा भूगोल आणि आर्थिक कणा मोडत चालला आहे. झोपेंचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला मात्र त्याचे कोणतेच सोयरसुतक नसल्याचा आरोप होत आहे.
शिवरे गावचे भौगोलिक क्षेत्र ८०६ हेक्टर असून त्यापैकी वनविभाग भौगोलिक क्षेत्र २७४ हेक्टर, महसुली क्षेत्र ५३२ हेक्टर आहे. याबाबत शेतकरी सुर्यकांत पायगुडे म्हणाले की, गावातून शिवकालीन जुना पुणे सातारा मार्गासाठी ९० एकर, पुणे - सातारा महामार्गासाठी १५० एकर, रिंगरोडसाठी ११३ एकर जमीन संपादित झाली आहे. तसेच जेजुरी ते हिंजवडी उच्च दाबाची वीजसाठी १३ मनोरे उभारणी होणार आहे. एका मनोऱ्यासाठी पाच गुंठे जागा अधिक ८० मीटर जागा बाधित होणार आहे. तसेच वीजवाहक तारा खाली शेती क्षेत्र बाधित होणार आहे.
शिवरे येथील जमिनींचे मोठ्या प्रमाणावर संपादन प्रस्तावित आहे. सातबारा उताऱ्यावर रिंगरोडसाठी आरक्षण पडल्यामुळे जमिनीच्या खरेदी-विक्रीवर व कर्जावर तात्पुरता निर्बंध लादले जाणार आहे. वारंवार भूसंपादनामुळे विपरीत परिणाम होणार असल्याची धग पेटत असल्याने आगामी काळात तीव्र स्वरुपाचे आंदोलन उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
वारंवार विरोध करूनही शासनाकडून भूसंपादन केले जाते. आता शेतकऱ्यांच्या जागांसाठी बळजबरी केल्यास शासकीय योजनांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. तसेच शेतकरी सूर्यकांत पायगुडे, तानाजी डिंबळे, निखिल डिंबळे, धनेश डिंबळे, बाळासाहेब धुमाळ, लक्ष्मण डिंबळे, रघुनाथ डिंबळे, सुनील डिंबळे, मारुती गायकवाड, जगताप भाऊ, विलास कापरे, संदीप कापरे आदींनी आंदोनलनाचा इशारा दिला आहे. (समाप्त)
बंदिस्त एक्स्प्रेसचाही फटका
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा तब्बल १५ हजार कोटी रुपयांचा नवीन ८ पदरी बंदिस्त एक्सप्रेसमुळे विकासाला खीळ बसणार आहे. यासाठी शिवरे गावातील क्षेत्र संपादित होणार असून १३० किलोमीटर लांबीचा मार्ग अटल सेतूपासून सुरू होऊन शिवरे गावापर्यंत जोडला जाणार आहे.
रिंगरोडसाठी नव्याने शिवरेचा समावेश
गावामध्ये विविध मोठ्या पायाभूत प्रकल्पांमुळे वारंवार भूसंपादन केले जात आहे. पुणे रिंगरोड आणि मुंबई - पुणे तिसरा द्रुतगती मार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी जमिनी संपादित केल्या जात आहेत. शिवरे गावाला बाधित करणाऱ्या प्रमुख प्रकल्प म्हणजे पुणे रिंगरोड, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा पश्चिम रिंगरोड. भोर तालुक्यातील रिंगरोडच्या मूळ रचनेत बदल करून नव्याने शिवरे गावाचा समावेश करण्यात आला आहे.