

पुणे: चांगल्या आयुष्याच्या शोधात गाव सोडून पुण्यात आलो. चांगली नोकरी मिळेल, संसार सुखाचा होईल, अशी स्वप्ने डोळ्यांत होती. पण, शिक्षण कमी आणि संधी कमी असल्याने एका खासगी कंपनीत शिपाई म्हणून काम करतोय. महिन्याला अवघे १२ हजार रुपये मिळतात. पत्नी आणि दोन मुलांचा संसार या पैशांत कसा चालवायचा, हा प्रश्न दर महिन्याला माझ्यासमोर उभा असतो. तरीही हार मानलेली नाही. एक दिवस माझी स्वप्ने पूर्ण होतील, हा विश्वास अजूनही जिवंत आहे, अशा शब्दांत अभिषेक यांनी आपल्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी सांगितली.
पुण्यातील अनेक खासगी संस्था, बँका आणि कंपन्यांमध्ये कार्यालयीन मदतनीस किंवा शिपाई म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची हीच कहाणी आहे. कार्यालय उघडण्यापासून ते बंद होईपर्यंत त्यांची धावपळ सुरू असते. चहा- पाणी देणे, कागदपत्रे पोहोचवणे, कुरिअरची कामे करणे, कार्यालयाची स्वच्छता राखणे, अशा असंख्य जबाबदाऱ्या ते न कुरकुरता पार पाडतात. मात्र, दिवसाचे आठ ते दहा तास कष्ट करूनही त्यांच्या हातात येणारा पगार आहे फक्त १२ ते १५ हजार रुपये. वाढत्या महागाईने त्यांचे जगणे आणखी कठीण केले आहे. घरभाडे, मुलांचे शिक्षण, दैनंदिन खर्च भागविताना त्यांच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही.
कधी- कधी उसनवारीही घ्यावी लागते. अनेक जण ग्रामीण भागातून रोजगाराच्या आशेने शहरात आलेले आहेत. मात्र, शिक्षणाचा अभाव आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांना कमी पगाराच्या नोकरीवरच समाधान मानावे लागत आहे. कामाच्या ठिकाणी त्यांना मिळणारा सन्मान, वेतन आणि सामाजिक सुरक्षा याबाबत अजूनही अनेक प्रश्न कायम आहेत. एका बँकेत काम करणारे संदीप जगधने सांगतात, मी एका बँकेत कार्यालयीन कर्मचारी म्हणून काम करतो. कार्यालयातील काम करताना खूप धावपळ होते. हे काम खूप मेहनतीचे आहे. पण, नऊ तास काम करून महिन्याला हातात येतात फक्त १३ हजार रुपये. पीएफ नाही, वैद्यकीय सुविधा नाहीत, भविष्यासाठी कोणतीच हमी नाही.
त्यामुळे सायंकाळी बँकेची नोकरी संपल्यानंतर मी घराघरांत फूड पार्सल पोहोचविण्याचे काम करतो. शरीर थकते, पण कुटुंबासाठी थांबता येत नाही. आम्हालाही नोकरीत पीएफ, वैद्यकीय सुविधा आणि इतर सवलती मिळायला हव्यात. तो आमचा हक्क आहे. कर्मचाऱ्यांच्या घामावर कार्यालयांची व्यवस्था उभी असते; पण त्याच्या जगण्याच्या प्रश्नांकडे मात्र समाजाचे आणि व्यवस्थेचे दुर्लक्ष होताना दिसते. संघर्ष, जबाबदारी आणि आशा यांचा मेळ साधत तो रोज नव्या उमेदीने कामावर जातो. त्याच्या आयुष्याची ही कहाणी म्हणजे खऱ्या अर्थाने 'जिणं कष्टकऱ्यांचं' होय.
पगार संपतो, स्वप्ने नाहीत...
महिन्याच्या पहिल्या तारखेला हातात पगार पडतो आणि काही दिवसांतच तो संपून जातो. घरभाडे, किराणा, वीजबिल, मुलांच्या शाळेची फी आणि इतर खर्च भागवताना हातात काहीच उरत नाही. मात्र, या आर्थिक चक्रव्यूहात अडकूनही आपल्या मुलांचे भविष्य घडविण्याचे स्वप्न हे कार्यालयीन कर्मचारी जिवापाड जपतात. पोटासाठी तडजोड करतात; पण मुलांच्या शिक्षणासाठी शक्य तेवढा त्याग करतात.