मंचर : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून आढळराव पाटील यांना मताधिक्य देण्यासाठी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राजकीय व्यूव्हरचना आखून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. शिरूर लोकसभा मतदारसंघात या वेळी प्रथमच वळसे पाटील यांची ताकद आढळराव यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. सन 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खासदार डॉ. अमोल कोल्हे हे निवडणुकीच्या मैदानात होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेतून उभे राहिलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. त्यावेळी डॉ. कोल्हे हे नवखे उमेदवार असल्याने त्यांच्या प्रचाराची धुरा वळसे पाटील यांनी सांभाळली होती. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून डॉ. कोल्हे यांना 25 हजार मतांचे मताधिक्य मिळाले होते.
शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या प्रचाराची सर्व जबाबदारी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावर दिली असल्याचे बोलले जात आहे. वळसे पाटील हे पक्षातील ज्येष्ठ नेते असून, त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. आंबेगाव तालुक्यातील विविध सहकारी संस्था, ग्रामपंचायत, सोसायटी यांच्यावर वळसे पाटील यांची पकड आहे. शिरूर, जुन्नर, खेड तालुक्यातही त्यांना मानणारा
वर्ग आहे. तसेच त्यांचे कार्यकर्त्यांचे जाळे मोठे असून महिला संघटनही उत्तम आहे. त्यामुळे वळसे पाटील पुढील काळात प्रचार यंत्रणा
कशी राबवतात व डॉ. अमोल कोल्हे यांना रोखण्यासाठी काय रणनीती आखतात, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा