पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सुमारे महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा शहरात शुक्रवारी (दि.25) हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. जुलै महिन्यात सुमारे तीन आठवडे झालेल्या पावसाने शहर परिसराच्या वातावरणात गारवा निर्माण झाला होता; मात्र ऑगस्ट महिना सुरू झाल्यानंतर पावसाने गेले तीन आठवडे उघडीप दिली होती. श्रावण महिना असूनही शुक्रवारी सकाळपासून हवेत उकाडा वाढला होता.
दुपारी दोन वाजल्यापासून पावसाचे वातावरण झाले होते. काहीवेळाने पावसाला सुरुवात झाली. सुमारे दोन तास झालेल्या पावसाने शहरातील सखल भागात पाणी साचले होते. उपनगरात काही ठिकाणी मध्यम ते तुरळक पावसाच्या सरींनी हजेरी लावली. कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची पावसामुळे फजिती झाली. काही ठिकाणी तुरळक झालेल्या पावसाने रस्ते निसरडे झाले होते. शहराला पाणीपुरवठा करणारे धरण भरले असून वर्षभराची चिंता तरी मिटली आहे.
हेही वाचा