

बाजीराव रोकडे
पुणे: मागील 38 दिवसांपासून सुरू असलेल्या इराण व इाइल-अमेरिकेमधील युद्धाचे चटके सर्वसामान्यांना जाणवत असले, तरी त्याची सर्वाधिक झळ मात्र पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना बसली आहे. गॅसटंचाईमुळे पुण्यातील बहुतांश मेसचालकांनी दर वाढवण्या सोबतच जेवणातून मेन्यूही कमी केल्याने विद्यार्थ्यांचे जेवण आणि जीवन अळणी झाल्याची प्रचिती येत आहे.
राज्याच्या विविध भागांतील विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात आलेले आहेत. परंतु, आखाती देशातील युद्धामुळे महिनाभरानंतरही या विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून खिशाला परवडणारे असे पोटभर जेवण कुठे मिळते का? यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे हे युद्ध कधी एकदाचे संपते व परिस्थिती पूर्ववत होऊन जेवणासाठी सुरू असलेला संघर्ष कधी संपतो, याची वाट पाहत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. पूर्वी मेसवर 50 रुपयांमध्ये पोटभर जेवण मिळत होते. मात्र, आता मेसचालकांनी नाइलाजाने 10 ते 20 रुपयांपर्यंत भाव वाढवले. त्यातच जेवणातून काही पदार्थ व पोळ्यांची संख्याही कमी केली.
त्यामुळे पोटही भरत नाही अन् अभ्यासातही मन लागत नसल्याचे विद्यार्थ्यांनी बोलून दाखवले. एखादेवेळी मेस बंद असली तर हॉटेलवरच्या एकदाच्या जेवणासाठी 120 ते 150 रुपये मोजावे लागतात. त्यामुळे बजेट कोलमडत असल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.
पोरांनो, आजचे जेवण करून घ्या, उद्याचे उद्या बघू...
बुकिंग केल्यावर गॅस सिलिंडर मिळाले तरी मेस सुरू ठेवायची की आपले घर चालवायचे? हा प्रश्न बहुतांश मेसचालकांना भेडसावत असताना पर्वती परिसरातील लक्ष्मीनगरमधील मुळे काकूंची मेस मात्र विद्यार्थ्यांच्या पोटाचा प्रश्न सोडविण्यात व्यस्त होती. युद्धाची झळ सोसवत नसतानाही त्यांनी माणुसकी जपली. ‘पोरांनो, आजचे जेवण करून घ्या, उद्याचे उद्या बघू’ म्हणत या मुलांना दिलासा देण्याचे काम शारदा मुळे यांनी केले. शिक्षण घेणारी मुले, मुली आणि गेस्ट अशी 20 ते 25 जणांची दररोज पंगत उठते, अशी माहितीही काही विद्यार्थ्यांनी दिली.
बारावीची परीक्षा सुरू असतानाच पुण्यातील बहुतांश मेसला टाळे लागले होते. परंतु आमच्या काकूंची मेस सुरू राहिल्याने आम्हाला दिलासा मिळाला. आम्ही उपाशी राहू नये म्हणून जादा किमतीने गॅस सिलिंडर खरेदी करून आम्हाला जेवण दिले.
नीलकंठ तोडरमल, विद्यार्थी
पुण्यात मी गेल्या सात वर्षांपासून आहे. माझे रोजचे जेवण मेसवरच अवलंबून असते. जेवणाबाबत सध्याची स्थिती ही कोरोना काळापेक्षा अधिक बिकट असल्याचे जाणवते. माझ्या मेसवरील चपातीचा आकार लहान होण्यासह जाडी कमी झाली आहे. शिवाय चारऐवजी तीनच पोळ्या आणि तीन भाज्यांऐवजी आता फक्त एकच भाजी मिळते. चपाती 8 वरून 10 रुपये, तर भाकरी 20 वरून 25 रुपये झाली आहे. जेवणाचा खर्च वाढल्याने खिशाला झळ बसत आहे.
चंद्रकांत मचिंदर, विद्यार्थी
मी गत 20 ते 25 वर्षांपासून मेस चालवते. या मुलांना उपाशी ठेवणे योग्य होणार नाही. याची जाणीव असल्याने तिप्पट किंमत मोजून गॅस सिलिंडर घेतले व मुलांना जेवण दिले. संकटाच्या काळात या मुलांना दोन घास खाऊ घातल्याचे समाधान आहे.
शारदा रामेश्वर मुळे, मेसचालक, लक्ष्मीनगर, पर्वती पायथा