

पुणे: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मध्यवर्ती पेठ भागात गणेश मंडळांकडून देखावे आणि मंडप उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, काही लहान-मोठ्या मंडळांनी नियमांना धाब्यावर बसवून, थेट निम्म्यापेक्षा अधिक रस्त्यांवरच अवाढव्य मंडप उभारल्याने पेठ भागात पीक अवरला वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडत आहे.
त्यामुळे महापालिका प्रशासनाने मंडळाच्या देखावे मंडपांचे नियोजन शिस्तबध्द स्वरूपात करावे, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता आणि टिळक रस्त्याला जोडणाऱ्या अरुंद गल्लीबोळांत मंडपांचे खांब आणि कामाच्या साहित्यामुळे रस्त्यांची रुंदी सध्या कमालीची घटली आहे.
यामुळे सकाळच्या आणि सायंकाळच्या पीक अवर्समध्ये रुग्णवाहिका, पीएमपीएमएल बस आणि नोकरदारांची वाहने तासन् तास कोंडीत अडकून पडत आहेत. उत्सवाचा आनंद नक्कीच आहे; पण रस्त्यांवरून चालणेही अशक्य व्हावे इतकी बेफिकिरी योग्य नाही, असा संताप पुणेकर नागरिक आणि वाहनचालक व्यक्त करीत आहेत.
पुणेकरांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, पोलिसांनी व महापालिकेने दिलेल्या नियमावलीनुसारच मंडप उभारले जातील, याची काटेकोर पाहणी करावी. तसेच, वाहतुकीला अडथळा न ठरता देखावे आणि मंडप कसे उभारता येतील, यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत.
पेठ भागात रोज गाडी चालवणे म्हणजे मोठी कसरत झाली आहे. सणाचा उत्साह नक्कीच असावा; पण रस्त्याचा तीनचतुर्थांश भाग काही मंडळांच्या मंडपांनीच व्यापल्यामुळे 15 मिनिटांच्या अंतरासाठी पाऊण तास लागतोय. मंडळांनी सामाजिक भान ठेवून थोडी जागा वाहतुकीसाठी मोकळी सोडायला हवी. प्रशासनानेही फक्त कागदावर नियम न ठेवता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कारवाई करावी.
सिध्देश वाघ, वाहनचालक