Pune News : चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे आवर्तन

Pune News : चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे आवर्तन

कङूस : पुढारी वृत्तसेवा : खेडसह शिरुर तालुक्याला वरदान ठरलेल्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे शुक्रवारी (दि. १५) सकाळी ९ वाजता रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन ३०० क्युसेक वेगाने सोडण्यास सुरुवात झाली आहे. चासकमान धरणात ९३.६३ टक्के इतका पाणी साठा शिल्लक असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत ६६४ मिलिमिटर इतका पाऊस झाला आहे. म्हणजेच दर वर्षीच्या तुलनेने पावसाने सरासरी गाठलीच नाही.

खेडसह शिरुर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेले खरीप हंगामात सोडण्यात आलेले आवर्तन दि १५ आँक्टोबर रोजी संध्याकाळी बंद करण्यात आले होते. या नंतर शेतकऱ्यांनी कालव्याच्या पाण्याच्या भरोशावर रब्बी हंगामातील पिकांच्या लागवडी मोठ्या प्रमाणात केल्याने कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी जोर धरु लागली होती. अखेर प्रशासनाने कालव्याद्वारे शुक्रवारी सकाळी पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.

पहिले आवर्तन सोडण्यात आल्यामुळे या आवर्तनाचा खेडसह शिरुर तालुक्यातील रब्बी हंगामातील कांदा, बटाटा, ज्वारी, गहू हरभरा, मका, आदी सह तरकारी पिकांना फायदा होणार आहे. दरम्यान या वर्षी परतीच्या पावसाने दडी मारल्याने ऐन डिसेंबर महिन्यात धरणातील पाणीसाठा काहीसा घटला असून यावर्षी पाणी टंचाई भासणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच कालव्याचे अस्तरीकरन काही ठिकाणी न झाल्याने चासकमान धरणाच्या कालव्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊन नासाडी होण्यास सुरुवात झाली आहे.

अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये पाणी साचणार असून पिकांची नासाडी होणार आहे. यामुळे प्रशासनाने कालव्याचे पाणी पुर्ण क्षमतेने न सोडता योग्य क्षमतेने सोडण्यात यावे अशी मागणी होत आहे. दरम्यान चासकमान धरणाच्या पाण्याचे प्रशासनाने योग्य नियोजन, तसेच पाणी सोडण्याच्या तारखा जाहीर न केल्याने आवर्तनाची मागणी वाढली तर धरणाच्या कालव्याद्वारे पाणी सोडावे लागणार आहे.त्यामुळे धरणा अंतर्गत असलेल्या गावांना उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news