

पुणे: महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांतील नागरिकांनी आपल्या प्रभागातील मूलभूत समस्यांचा स्पष्ट आणि ठाम शब्दांत पाढा वाचला आहे. नियमित व पुरेशा पाणीपुरवठ्याचा अभाव, वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, अतिक्रमणे, अपुऱ्या नागरी सुविधा आणि सुरक्षिततेचा प्रश्न, या पुणेकरांच्या प्रमुख तक्रारी म्हणून समोर आल्या आहेत. विकास केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात दिसावा, हीच सर्व भागांतील नागरिकांची एकमुखी भावना असून, नव्याने निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी पक्षीय राजकारणापेक्षा नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य द्यावे, अशी ठाम अपेक्षा पुणेकरांनी व्यक्त केली आहे.कमी दाबाने व अनियमित येणारे पाणी, नगर रस्त्यावरची कोंडी तसेच जागोजागी कचरा, या समस्या वाढत आहेत. पावसाळ्यात ठरावीक भागांत पूरस्थिती, नदीपात्रातील कचरा आणि बेकायदा केबलचे जाळे, यामुळे परिसरातील सुरक्षितता व पर्यावरण धोक्यात आले आहे. महापालिकेमार्फत वाचनालय, अभ्यासिका सुरू करणे तसेच बंद पडलेली भाजी मंडई पुन्हा कार्यान्वित करावी, हीच वडगाव शेरीकरांची रास्त अपेक्षा आहे.
परिसर संमिश्र लोकवस्तीचा असला तरी येथे पाणीपुरवठा अनियमित असून, अनेक वेळा कमी दाबाने पाणी येते, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. याशिवाय कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज व्यवस्था आणि वाढती वाहतूक कोंडी या मूलभूत समस्या अद्यापही कायम आहेत. प्रशासकीय काळात या प्रश्नांकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही. आता निवडून आलेल्या नगरसेवकांमुळे तरी या समस्या मार्गी लागतील आणि नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
कमलेश यादव, छत्रपती शिवाजीनगर गावठाण
खडकमाळ आळी परिसरात अनेक मूलभूत समस्या आहेत. येथील रस्ते अत्यंत अरुंद असल्याने वाहतूक कोंडी नेहमीचीच झाली आहे. कचऱ्याची समस्या तीव स्वरूपाची झाली असून, याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. तसेच स्वतंत्र मैदान किंवा खुली जागा नसल्याने त्यांच्या शारीरिक व मानसिक विकासावर मर्यादा येत आहेत. स्वारगेट परिसरात मोठी अतिक्रमणे झाल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. या सर्व समस्यांकडे स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
सोहम पिलावरे, खडकमाळ आळी
सहकारनगरमधील क्रमांक 1 परिसरात छाटणीदरम्यान तोडलेल्या झाडांच्या फांद्या अन् पालापाचोळा वेळेवर उचलला जात नसल्याने अस्वच्छता होत आहे. गजानन महाराज मंदिरालगत अनेक अतिक्रमणे झाली असून, रस्ता इतका अरुंद झाला आहे की वाहन चालवणे तर दूरच, पायी चालणेही कठीण झाले आहे. याशिवाय मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे असले तरी सोसायटीतील अंतर्गत, महापालिकेच्या अखत्यारीतील रस्त्यांवर सीसीटीव्ही बसविणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून सुरक्षितता वाढेल.
नमता सागर भोसले, सहकारनगर, पद्मावती
जुन्या वाड्यांशी संबंधित अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित असून, त्यावर तातडीने ठोस निर्णय घेऊन मार्गी लावणे आवश्यक आहे. परिसरातील अरुंद रस्त्यांवर होणाऱ्या बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून, यावर नियोजनबद्ध उपाययोजना करणे गरजेचे आहे. कचरा व्यवस्थापनाचा प्रश्नही गंभीर असून, तो वेळच्या वेळी उचलणे आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. गरजू नागरिकांच्या आरोग्यासाठी आरोग्य शिबिरे अथवा इतर उपयुक्त योजनांचा विचार व्हावा. प्रभागातील अनेक युवक बेरोजगार असल्याने रोजगार मेळावे किंवा कौशल्यविकासाच्या संकल्पना राबवून त्यांना मदत करावी. महा-ई-सेवा केंद्र सुरू करून नागरिकांची सरकारी कागदपत्रांसाठी होणारी धावपळ थांबवावी.
मंदार निजामपूरकर, कसबा पेठ
रस्त्यांची सुरक्षितता, नियमित व सुरळीत पाणीपुरवठा, वाढती वाहतूक कोंडी, प्रभावी कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षण, या मूलभूत पायाभूत सुविधांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे. विशेषतः गजानन महाराज चौक ते बँक ऑफ महाराष्ट्र येथे कोंडी होत आहे. सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे प्रभावी देखरेख, वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी, दंडात्मक कारवाई आवश्यक आहे. स्पष्ट व उत्तरदायी असा कृती आराखडा प्रशासनाने मांडावा, हीच ठाम अपेक्षा आहे.
अजित देशपांडे, सहकारनगर, पर्वती
कमी दाबाने व अनियमित येणारे पाणी, नगर रस्त्यावरची कोंडी तसेच जागोजागी कचरा, या समस्या वाढत आहेत. पावसाळ्यात ठरावीक भागांत पूरस्थिती, नदीपात्रातील कचरा आणि बेकायदा केबलचे जाळे, यामुळे परिसरातील सुरक्षितता व पर्यावरण धोक्यात आले आहे. महापालिकेमार्फत वाचनालय, अभ्यासिका सुरू करणे तसेच बंद पडलेली भाजी मंडई पुन्हा कार्यान्वित करावी, हीच वडगाव शेरीकरांची रास्त अपेक्षा आहे.
निखिल बटवाल, वडगाव शेरी
श्रीराम चौक, महंमदवाडी रोड व ससाणेनगर चौक येथे भुयारी मार्ग असूनही वाहतूक कोंडी कायम आहे. या ठिकाणी तातडीने कार्यक्षम सिग्नलव्यवस्था व वाहतूक नियोजन करणे गरजेचे आहे. रस्त्यांवरील मोठे खड्डे तसेच फुटलेल्या पाणी व ड्रेनेज पाइपलाइनमुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागतो. बेकायदेशीर व्यवसाय, गुंडगिरी व असुरक्षिततेची भावना, यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
कादंबरीताई, हडपसर-हांडेवाडी रोड
सिंहगड रोडवर खड्ड्यांची समस्या गंभीर आहे. मुख्य सिंहगड रोडसह अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय असून, वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कचरा गोळा करणाऱ्या सेवकांवर अनावश्यक ताण येत असून, नागरिकांकडून वेळोवेळी कचरा रस्त्यावर टाकला जातो. ही समस्या रोखण्यासाठी स्ट्रीट लाइटच्या खांबांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे.
तेजा जोशी, सिंहगड रोड
बावधनचे रस्ते अरुंद व खराब अवस्थेत असून, रस्त्यावरील लाइट्स अपुऱ्या आहेत. कचरा व्यवस्थापन नीट नसल्यामुळे अस्वच्छता वाढली आहे. सर्वांत मोठी समस्या म्हणजे मुख्य पाणीपुरवठ्याची आहे. सोसायटीला पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून, त्यासाठी रहिवाशांना अतिरिक्त मेंटेनन्स भरावा लागतो. स्थानिक टँकरचालकांमुळेही पाणीपुरवठ्यात अडथळे येत आहेत.
नयना ललवाणी, बावधन
रस्ते बांधकाम झाल्यानंतर किमान पाच वर्षे कोणत्याही कारणासाठी पुन्हा खोदावे लागू नयेत, याची काटेकोर दक्षता घ्यावी. रस्ते तयार करताना पाणी साचले जाऊ नये, यासाठी चेंबर, ड्रेनेज व जोडणारे रस्ते यांची लेव्हल एकसमान ठेवावी. पदपथ पूर्णपणे अतिक्रमणमुक्त होईल. सार्वजनिक शौचालये स्वच्छ, दुर्गंधीमुक्त ठेवावीत. नागरिकांशी संपर्क ठेवण्यासाठी चारही नगरसेवकांनी संपूर्ण कार्यकाळात जनसंपर्क कार्यालय सुरू ठेवावे.
आदित्य काटे, सदाशिव पेठ
मूलभूत प्रश्न सोडवून विधायक कामे राबविल्यास पुणे शहर खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी होईल. प्रभागात हेरिटेज विभागात मोडणारी देवस्थाने आहेत. त्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे; जेणेकरून येथील धार्मिक स्थळांचाही विकास होईल. विशेषतः जंगली महाराज रस्त्यावरील भुयारी मार्गात आवश्यक सुरक्षा यंत्रणा बसवून सुरू करणे गरजेचे आहे
संध्या बहिरट, शिवाजीनगर गावठाण
मध्यवस्तीतील विशेषतः नारायण पेठेतील मुख्य आणि अंतर्गत रस्ते, पदपथ, पत्र्या मारुती, लोखंडे तालीम, मोदी गणपती, रमणबाग चौक आदी भागांत पदपथ स्टॉल तसेच उपाहारगृहांनी व्यापले आहेत. येथे रस्ते अरुंद होऊन या ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी होते. त्याचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास होतो. संबंधित स्टॉल तसेच उपाहारगृहांकडून महापालिकेला कर मिळत असेल. मात्र, तेथील रहिवासी व पादचारीही कर भरतात, याचा विचार व्हावा.
उदय पाटणकर, नारायण पेठ