

पुणे: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अतिसंवेदनशील व अतिज्वलनशील वायूचा टँकर पलटी झाल्याने संपूर्ण महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. याचा फटका वाहनचालक व प्रवाशांना बसला, हे मान्य करत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रशासनाकडून काही प्रमाणात त्रुटी राहिल्याची कबुली दिली. मात्र, अपघातग््रास्त टँकरमध्ये असलेल्या वायूमुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष दक्षता घेणे अपरिहार्य होते, असे त्यांनी सांगितले. या घटनेचा अभ्यास करून भविष्यातील असे प्रसंग टाळण्यासाठी प्रशासन रायगड प्रशासनाच्या मदतीने उपाययोजना करेल असेही त्यांनी सांगितले.
शहरात पंधरा दिवसांपूर्वी ‘पुणे ग््राँड टूर’ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेसाठी महापालिका हद्दीसह स्पर्धा मार्गावरील रस्ते नव्याने विकसित केले होते. स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय निकषांनुसार हे रस्ते तयार केले असून, भविष्यात या रस्त्यांवर पुन्हा खोदाई होऊ नये तसेच याच धर्तीवर इतर रस्त्यांचेही काम व्हावे, यासाठी निर्णय घेण्याच्या उद्देशाने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक आयोजित केली होती.
या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह महावितरण, बीएसएनएल आणि पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर महापालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत द्रुतगती महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीबाबत जिल्हाधिकारी डुडी यांना प्रश्न विचारण्यात आला.
यापूर्वीही घडल्या होत्या अशा घटना
यापूर्वीही द्रुतगती महामार्गावर टँकर पलटी होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र, त्या वेळी कमी वेळेत अपघातग््रास्त वाहन बाजूला काढून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले होते. दोन दिवसांपूर्वी लोणावळा परिसरातही असा प्रकार घडला होता. त्या टँकरमध्येही अतिज्वलनशील वायू असल्याने गळती थांबविणे हे जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान होते.
पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणार
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. टँकरचालकांचे प्रशिक्षण, सुरक्षित वेगमर्यादा यांचा अभ्यास सुरू आहे. भविष्यात अशा घटना घडल्यास वाहनचालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले आहे.