

पुणे: उत्पादन क्षेत्रात पावसाने ओढ दिल्याचा परिणाम बाजारातील डाळी, तांदूळ आणि गव्हाच्या भावावर दिसू लागला आहे. उत्पादन घटण्याच्या शक्यतेमुळे गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार बाजारात तूरडाळ आणि मूगडाळ किलोमागे प्रत्येकी पाच रुपयांनी, तर हरभराडाळ तीन रुपयांनी महागली आहे.
बेसनच्या भावातही किलोमागे तीन रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे साखरेच्या भावात सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण झाली असून, किलोमागे पाच रुपयांनी भाव कमी झाले आहेत. कर्नाटकातील तांदूळ उत्पादक भागात पावसाने ओढ दिल्याने नोव्हेंबरमध्ये बाजारात येणाऱ्या पिकाबाबत चिंता निर्माण झाली आहे.
त्याचा परिणाम उकडा आणि कोलम तांदळाच्या भावावर झाला असून, दोन्ही प्रकार किलोमागे एक रुपयाने महागले आहेत. आगामी काळात तांदळाच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी विजय मुथा यांनी व्यक्त केली. उत्पादन क्षेत्रातून आवक कमी झाल्याने गव्हाच्या भावातही किलोमागे एक रुपयाची वाढ झाली आहे.
दरम्यान, तयार साखरेच्या आयातीला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. तसेच आगामी सणांसाठी घरगुती ग्राहकांची खरेदी यापूर्वीच झाल्याने बाजारातील मागणी कमी झाली आहे. परिणामी, साखरेच्या भावात किलोमागे ५ रुपयांची घट नोंदविण्यात आली.
साखर (प्रतिक्विंटल) ४७००-४८०० रु. तांदूळ:- गुजरात उकडा ४३००-४८००, मसुरी ३४००-३६००, सोना मसूरी ५४००-५८००, एच.एम.टी. कोलम ६७००-७०००, लचकारी कोलम ७३००-७८००, रु. डाळी:- तूरडाळ १००००-१३०००, हरभराडाळ ७७००-८०००, मूगडाळ ९०००-१००००, मसूरडाळ ७५००-७६००, मटकीडाळ १०००-१०५००, उडीदडाळ १००००-१२५०० रु.