

पुणे: आयुष्यभर साथ देण्याच्या शपथा घेत, कुटुंबीयांना न सांगता प्रेमविवाह करणाऱ्या तरुण दाम्पत्याचा संसार थाटण्याआधीच कोसळला. एकत्र राहण्याचे धाडस न झाल्याने आणि कुटुंबीयांच्या विरोधामुळे मुलीनेही लग्नगाठ तोडण्याचा निर्णय कायम ठेवल्याने अखेर कौटुंबिक न्यायालयाने या दाम्पत्याचा घटस्फोट मंजूर केला. सुखी संसाराची स्वप्ने डोळ्यांत घेऊन सुरू झालेल्या या प्रेमकथेचा शेवट मात्र न्यायालयात घटस्फोटाने झाला.
विजय आणि विजया (दोघांचीही नावे बदललेली) हे एकाच परिसरात राहत असल्याने ते एकमेकांना ओळखत होते. दोघेही उच्चशिक्षित. ती 25 वर्षांची, तर तो 28 वर्षांचा. कालांतराने त्यांची मैत्री प्रेमात बदलली. त्यानंतर दोघांनी 19 एप्रिल 2024 रोजी कोर्ट मॅरेज केले. मात्र, विवाहानंतरही त्यांनी एकत्र संसार सुरू करण्याचे धाडस केले नाही. दोघेही आपापल्या घरीच राहू लागले. काही दिवसांनंतर विवाहाची माहिती विजयाने आईला दिल्यानंतर घरातून तीव विरोध झाला. मुलीचे कुटुंबीय या नात्याला तयार नसल्याने तिच्यावर मानसिक दबाव वाढला.
अखेर विजयाने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. विजयला याची माहिती नोटीसद्वारे मिळाली. सुरुवातीच्या सुनावण्यांना विजय गैरहजर राहिला. नंतर त्याने ॲड. नीता भंवर यांच्यामार्फत वकीलपत्र दाखल केले. विजय नांदविण्यास तयार असल्याचे सांगत होता. मात्र, विजया घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम होती. यादरम्यान, भंवर यांनी दोघांचे समुपदेशन केले. अखेर, विजयाने केलेला एकतर्फी घटस्फोटाचा अर्ज परस्पर संमतीने केलेल्या अर्जात बदलला. त्यानंतर, न्यायालयानेही घटस्फोटाचा अर्ज मंजूर करीत दोघांचा मार्ग मोकळा केला.
नांदविण्याची तयारी दर्शविताच पोटगी, स्त्रीधनास नकार
घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असताना विजयाने पोटगी व स्त्रीधनाची मागणी केली. विजयने मात्र नांदवण्याची तयारी दर्शवत ही मागणी नाकारली. या वेळी दोघांचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर विजयसुद्धा घटस्फोटासाठी तयार झाला. या वेळी विजयाने पोटगी आणि स्त्रीधनाची केलेली मागणी गुंडाळली. मात्र, विजयने घटस्फोटाच्या दाव्यासाठी आलेल्या खर्चाची मागणी केली. ते मिळाल्यानंतर दोघांचे वैवाहिक नाते अधिकृतरीत्या संपुष्टात आले.
विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नाही, तर दोन कुटुंबांचा संबंध असतो. माझ्या पक्षकाराने पत्नीला नांदविण्याची तयारी स्पष्टपणे न्यायालयासमोर दर्शवली होती. मात्र, पत्नीने एकत्र राहण्यास नकार देत घटस्फोटावर ठाम भूमिका घेतली. समुपदेशनाद्वारे मतभेद मिटवण्याचा प्रयत्नही झाला; परंतु त्यातून कोणताही सकारात्मक निष्कर्ष निघाला नाही. अखेरीस दोघांच्याही भविष्यातील हिताचा विचार करून तडजोडीने हा वाद निकाली काढण्यात आला. न्यायालयाने दिलेला निर्णय परिस्थितीनुरूप योग्यच आहे.
ॲड. नीता भंवर, पतीच्या वकील