

निनाद देशमुख
पुणे: स्वच्छ सर्वेक्षणात मानांकन मिळविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या महापालिकेचा कचरा व्यवस्थापनाचा डोलारा नागरिकांच्या जिवावर उठला आहे. शहरातील कोथरूड, पाषाण-सूस रस्ता, लुल्लानगर आणि वारजे यांसारख्या प्रमुख भागांत कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकमधून ‘लिचेड’ (कचऱ्यातील विषारी घाण पाणी आणि तेलकट द्रव) रस्त्यावर सांडण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे रस्ते निसरडे होत असून, त्यावरून दुचाकीस्वार घसरून अपघातांच्या मालिकेत मोठी वाढ झाली आहे.
पुण्यात रोज जवळपास दोन हजार टन कचरा तयार होतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तो शहरातील विविध भागांतून गोळा करून कचरा रॅम्पवर वर्गीकरणासाठी नेला जातो. या कचऱ्याची वाहतूक छोट्या टेम्पो ते मोठ्या बीआरसी वाहनातून केली जाते. मात्र, कचरा वाहून नेताना योग्य काळजी घेतली जात नाही. मोठ्या वाहनांना असणाऱ्या फटीतून कचऱ्याचे लिचेड थेट रस्त्यावर पडते. या वेळी मागून येणारी वाहने यावरून घसरून पडतात. विशेषत: दुचाकी वाहनांचा यामुळे अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे.
प्रामुख्याने कोथरूड कचरा डेपो परिसर, कात्रज चौक, वारजे महामार्गालगतच्या भागांत काही दिवसांपासून या लिचेडमुळे अपघात वाढले आहेत. कचरा वाहून नेणारे ट्रक पूर्णपणे सील केलेले नसल्यामुळे त्यातील घाण पाणी संथगतीने रस्त्यावर सांडत जाते. हे पाणी इतके तेलकट आणि चिकट असते, की साध्या बेकवरही दुचाकींचे नियंत्रण सुटते. रात्रीच्या वेळी किंवा पहाटे या समस्येचे स्वरूप अधिक भीषण असते, कारण, याचा चालकांना अंदाज येत नाही.
कचरा वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांची अवस्था दयनीय
कचरा व्यवस्थापनासाठी दर वर्षी महापालिका कोट्यवधींच्या निविदा काढते. मात्र, ज्या गाड्यांतून हा कचरा वाहून नेला जातो, त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. अनेक ट्रक सुस्थितीत नाहीत, त्यांची गळती रोखणारे कप्पे तुटलेले आहेत. त्यामुळे कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी प्रशासनाने याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले आहे का? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.
82 बीआरसी वाहनांपैकी 74 कार्यरत
शहरातील ओला व सुका कचरा संकलन करण्यासाठी 82 बीआरसी वाहने आहेत. त्यापैकी साधारणपणे 10 टक्के गाड्या या देखभाल दुरुस्तीसाठी बंद असल्याने प्रत्यक्षात 74 गाड्या कचरा उचलण्यासाठी उपलब्ध असतात. त्यामुळे गैरसोय होत आहे. त्यात ज्या गाड्या आहेत त्यातूनही लिचेड गळतीचे प्रमाण अधिक आहे. बीआरसी या गाडीतून एका वेळेला आठ ते दहा टन ओला कचरा जाऊ शकतो, तर, सुका कचरा हा बारा टनांपर्यंत वाहून नेला जातो. सध्या महापालिकेच्या मालकीच्या 42 गाड्या आहेत. 40 गाड्या ठेकेदाराच्या आहेत.
महापालिकेच्या घनकचरा विभागाकडे कचरा वाहून नेण्यासाठी टेम्पो व मोठी बीआरसी वाहने आहेत. शहरात निर्माण होणारा कचरा मोठ्या वाहनातून रॅम्पवर नेला जातो. यातूनच प्रामुख्याने गळती होते. आम्ही वाहन विभागाला अशा ट्रकची दुरुस्ती करून ही गळती रोखण्यास सांगितले असून, यावर उपाययोजना सुरू आहेत.
अविनाश सपकाळ, घनकचरा विभागप्रमुख, महापालिका
या जीवघेण्या समस्येवर तत्काळ तोडगा काढण्याची गरज आहे. कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांचे फिटनेस ऑडिट करावे, जुन्या आणि गळती असणाऱ्या गाड्या त्वरित बंद कराव्यात आणि ज्या कंत्राटदारांच्या गाड्यांमुळे अपघात झाले, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
शंकर जगताप, नागरिक