पुणे; पुढारी वृत्तसेवा : गणेश विसर्जन होऊनही शहरात अनेक ठिकाणी मंडप, स्वागत कमानी, रनिंग मंडपाचे बांबू, मिरवणुक रथ रस्त्याच्या कडेला उभे असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने संबंधीत मंडळांना नोटीस बजावल्या आहेत. तातडीने कार्यवाही न केल्यास पुढील वर्षी परवानगी दिली जाणार नाही, असा इशारा नोटीसद्वारे देण्यात आल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
गणेशोत्सवासाठी शहरातील गणेश मंडळांनी उत्सव मंडप, स्वागत कमानी, रनिंग मंडप उभारले होते. याशिवाय गणेश मिरवणुकीसाठी रथही तयार केले होते. विसर्जन मिरवणुकीनंतर संबंधीत मंडळाने सर्व साहित्य काढून मंडपासाठी खोदलेले खड्डे दुरुस्त करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करणे गरजेचे आहे. आता गणेशोत्सवाची सांगता झाली आहे.
तरीही शहरात अनेक ठिकाणी मंडप, रनिंग मंडप, देखाव्याचे साहित्य, स्वागत कमानींचे सांगाडे, मंडपाचे वासे, स्टेजच्या फळ्या आदी रस्त्याच्या कडेलाच पडून आहे. अनेक मंडळांकडून नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यामुळे त्या मंडळांकडून रनिंग मंडप आणि देखाव्याचे मंडप काढले नाहीत. तसेच मिरवणुकीचे रथही रस्त्याच्या कडेला उभे आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे.
याशिवाय मंडपाखाली पावसामुळे जमा झालेला राडारोडा अद्याप काढला गेलेला नाही. मुख्य विसर्जन मार्गावरील कचरा महापालिका प्रशासनाने दुसर्या दिवशी उचलला. मात्र शहरात अन्य रस्त्यावर अजूनही कचरा आणि निर्माल्य आहे. गेल्या पाच दिवसापासून हे निर्माल्य उचलण्यात आले नाही. नागरिकांना पुलावर हे निर्माल्य टाकले आहे. हे साहित्य तातडीने हलवण्यासाठी नोटीस बजावल्या आहेत. हे साहित्य न हलविल्यास आणि रस्ता मोकळा न केल्यास ते साहित्य जप्त केले जाईल.
हेही वाचा