

पुणे: केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रिये अंतर्गत इयत्ता अकरावीसाठीच्या पहिल्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी शुक्रवारी (दि. ३ जुलै) सकाळी १० वाजता जाहीर करण्यात आली. यामध्ये पुण्यातील २८ हजार २३४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून, या विद्यार्थ्यांना ५ जुलैपर्यंत महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने ही यादी प्रसिद्ध केली असून, विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिनमधील कॅप वाटप स्थिती या पर्यायावर जाऊन कोणते कनिष्ठ महाविद्यालय मिळाले, याची खात्री करून प्रवेशाची पुढील कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाविद्यालयाचे वाटप झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिनमधील दस्तऐवज अपलोड करा या पर्यायातून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून प्रवेशासाठी पुढे जा या पर्यायाद्वारे प्रवेशास सहमती नोंदवावी. त्यानंतर संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात दिलेल्या मुदतीत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी इन-हाऊस, अल्पसंख्याक आणि केंद्रीय कोट्यांतून प्रवेश निश्चित करण्यासाठी ३ ते ५ जुलै हा कालावधी निश्चित केला आहे.
विद्यार्थ्यांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आपल्या लॉगिनमध्ये जाऊन महाविद्यालयाचे वाटप तपासावे, असेही विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे. ज्या विद्यार्थ्यांना या फेरीत कोणतेही कनिष्ठ महाविद्यालय मिळाले नाही, त्यांनी इयत्ता दहावीतील गुण आणि संबंधित महाविद्यालयांचे कट-ऑफ लक्षात घेऊन पुढील फेरीसाठी प्रवेश अर्जाच्या भाग-२ मध्ये नवीन पसंतीक्रम भरून अर्ज लॉक करावा, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
अकरावी विशेष फेरी दृष्टिक्षेपात
पात्र विद्यार्थी - ८९,६६३
महाविद्यालयाचे वाटप झालेले विद्यार्थी - २८,२३४
पहिल्या पसंतीचे महाविद्यालय - १६,८४२
दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय - ५,७२७
तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय - २,२००
विद्यार्थी आकडेवारी
कला - १५,९८८
वाणिज्य - १८,४७१
विज्ञान - ४३,००७
एकूण - ७७,४६६