पिंपरी : भरधाव कंटेनरने वारकऱ्यांना उडवले; एकाचा जागीच मृत्यू तर तिघेजण जखमी

पिंपरी : भरधाव कंटेनरने वारकऱ्यांना उडवले; एकाचा जागीच मृत्यू तर तिघेजण जखमी
Published on
Updated on

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : भरधाव वेगातील कंटेनरने रस्त्याने चालणाऱ्या चार वारकऱ्यांना धडक दिली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर, तीन वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी (दि. २०) दुपारी चारच्या सुमारास तळवडे येथील कॅनबे चौकाजवळ हा अपघात झाला.

भगवान साहेबराव घुगे (३०, रा. बुलढाणा) असे मृत्यू झालेल्या वारकरी तरुणाचे नाव आहे. तर, बबन जायभाये (वय ५०), पुजाबाई साहेबराव घुगे (वय ५२), भिकाजी बनसोडे (वय ५०) हे तिघे जखमी झाले आहेत. पोलिसांनी कंटेनर चालक जगन्नाथ भानुदास मुंडे (४३, रा. म्हेत्रे वस्ती, चिखली) याला अटक केली आहे. याप्रकरणी भास्कर बाजीराव जायभाये (४१, रा. बुलढाणा) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी देहूगाव येथे राज्यभरातून वारकरी दाखल झाले आहेत. दरम्यान, तळवडे येथील कॅनबे चौकाजवळ सोमवारी दुपारी एका कंटेनरने रस्त्याने चालत जाणाऱ्या चार वारकऱ्यांना धडक दिली. या अपघातात भगवान घुगे यांचा जागीच मृत्यू झाला. तर, तीन वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी वारक-यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे. कंटेनर चालकाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news