फक्त दैव बलवत्तर म्हणून वारकरी बचावले; शिंदवणे घाटात वारकऱ्यांच्या ट्रकचा ब्रेक फेल | पुढारी

फक्त दैव बलवत्तर म्हणून वारकरी बचावले; शिंदवणे घाटात वारकऱ्यांच्या ट्रकचा ब्रेक फेल

उरुळी कांचन, पुढारी वृत्तसेवा: सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातून पंढरपूरच्या वारीसाठी आळंदीला जाणाऱ्या ६० हून अधिक वारकऱ्यांच्या ट्रकचे ब्रेक निकामी होऊन हा ट्रक दोन अवघड वळने पार करुन डोंगमाथ्याच्या कड्यावर धोकादायक वळणावर अडकून पडला आहे. या ट्रकमधील केबीनवर बसलेल्या ९ व्यक्ती या केबीनवरुन २५  फूट खाली डांबरीकरणवर आपटल्याने ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. देव बलत्तर म्हणून या वारकऱ्यांचा जीव वाचला आहे.

पंढरपूरला आषाढी वारीसाठी आळंदीला (एमएच १२ डीटी ४३६५) हा ट्रक जेजुरीमार्गे शिंदवणे घाटातून चालला होता. या ट्रकने पहिले वळण घेतल्यानंतर दुसऱ्या वळणावर चालकाला ब्रेक निकामी झाले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ट्रक चालकाने हा ट्रक घाटमाथ्यावर इतर पर्यायी जागेवर वळण्याचा प्रयत्न केला. पण ट्रक नियंत्रणात न आल्याने ट्रक तसाच पुढे सरकत जाऊन पुढे असलेल्या वळणावर लटकून पडला. केवळ दैव बलवत्तर म्हणून वळणावरील २५ फूट कड्यावर ट्रक लटकला. मात्र केबीनवर  बसलेले ९ वारकरी हे केबीवरून २५ फूट रस्त्यावर आपटले गेल्याने ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उरुळी कांचन येथील सिध्दीविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

या अपघातात अनिल सोमनाथ ढेरे (वय ५०), भागवत निवृत्ती शिंगारे (वय ६०), महेश भगवान (वय ६५), यशवंत भोसले (वय ७०), स्वामिनाथ गोरख पवार (वय ६५), संतोष गुलाब जगदाळे (वय ४२), जयश्री पवार, सावित्रीबाई गायकवाड, सुभाष कट्टी (रा. सर्व साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) अशी जखमींची नावे आहेत. अपघात घडताच कस्तुरी प्रतिष्ठान व अजिंक्य चॅरीटेबल फाऊंडेशनच्या रुग्णवाहिकेतून तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली. शिंदवणे ग्रामस्थांनी अपघात घडताच तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले.

Back to top button