

सुनील जगताप
पुणे : 'अवयवदान हेच श्रेष्ठदान' या विचारातून ४८ अवयवदात्यांच्या माध्यमातून १२६ अवयवांचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले आहे. नातेवाइकांच्या संवेदनशील निर्णयामुळे अनेक जणांना नवी जिंदगी मिळाली असली, तरी आजही हजारो रुग्ण जीवन-मृत्यूच्या उंबरठ्यावर असल्याचे विदारक चित्र आहे.
विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्राने यंदाच्या १ जानेवारी ते १२ ऑगस्टदरम्यानची पुणे विभागाची ही आकडेवारी दिलेली आहे. केवळ कागदावरील आकडे पाहण्यापेक्षा यामागील मानवी वेदना समजून घेणे गरजेचे आहे. जनजागृतीचा टक्का वाढल्यास हजारो रुग्णांचे प्राण वाचू शकतात. दात्यांच्या अपेक्षेने उंबरठ्यावर असलेल्या या रुग्णांना जगवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येण्याची नितांत गरज आहे.
आजच्या धकाधकीच्या आणि आधुनिक युगात मानवी संवेदनांचा एक नवा चेहरा अवयवदानाच्या रूपाने पुढे येत आहे. 'मरणोपरांतही जगता येते' हा विचार आता महाराष्ट्रभर रुजताना दिसत आहे. ब्रेनडेड झालेल्या व्यक्तींच्या शोकांतिकेतूनही अनेक रुग्णांना नवी जिंदगी मिळाल्याने आरोग्य क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.
मागणी आणि पुरवठा, यामध्ये अद्यापही मोठी दरी आहे. हजारो रुग्ण वेळेवर अवयव न मिळाल्यामुळे वेदनेने खचत आहेत. एकीकडे ४८ दात्यांनी ४८ कुटुंबांना सांत्वन देत १२६ जणांना जीवनदान दिले, तर दुसरीकडे हजारो नागरिक आजही दात्यांच्या अपेक्षेने उंबरठ्यावर उभे आहेत. समाजात अवयवदानावर आणखी जनजागृती झाली आणि नातेवाइकांनी दुःखाचा डोंगर बाजूला सारून 'ब्रेनडेड' रुग्णांच्या अवयवदानासाठी धैर्याने संमती दिली, तर ही प्रतीक्षा यादी वेगाने कमी होऊ शकते.
सध्याच्या परिस्थितीत अवयवदात्यांची संख्या आणि प्रतीक्षायादी यामध्ये खूप तफावत जाणवत आहे. जनजागृती होत असली, तरी नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. तसेच, अवयवदानाबाबत शासनाने कायदा करून सहकार्य करणे गरजेचे आहे.
डॉ. अलका क्षीरसागर, अध्यक्षा, इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे