सुपे: पुढारी वृत्तसेवा
बारामती तालुक्यातील सुपे येथे साखर वाहतूक करणारा मालवाहू ट्रक हॉटेलमध्ये घुसून तिघांना चिरडले असून यामध्ये रूकसाना दिलावर काझी (वय४५) या महिलेचा मृत्यू झाला आहे व अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना चौफुला मोरगाव रस्त्यावर सुपे बसस्थानकाच्या काही अंतरावर सोंडवळण म्हणून परिचित असणाऱ्या वळणावर घडली आहे.
यासंदर्भात युन्नुस इब्राहीम काझी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की रविवारी(दि .२९) रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान १२ टायर मालवाहू ट्रक( एम.एच.१६सी.सी.६१२३) हा साखर घेऊन चौफुले कडून मोरगाव कडे निघाला असताना ड्रायव्हर हनुमंत भालके (रा. निलंगा )हा दारूच्या नशेत होता.
ट्रक पूजा गार्डन मंगल कार्यालया कडून भरधाव वेगाने आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटून वळणावर पलटी होऊन हॉटेलमध्ये घुसला. या अपघातांमध्ये महिलेचा पती दिलावर इस्माईलभाई काझी ( वय ५०)मुलगा सोहेल दिलावर काझी(वय२५)रा.सुपे,बारामती हे जखमी झाले आहेत. यामध्ये मुजाईद अली अहमद अली सय्यद रा.बिजानोर ता.धामपूर (उत्तर प्रदेश)हे गंभीर जखमी झाले आहेत.
रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते.मालवाहू ट्रक क्रेन व जेसीबीच्या माध्यमातून उचलण्यात आला. मृत झालेली महिला ट्रकखाली अडकली होती. या संदर्भात अधिक तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.