ऐन उन्हाळ्यात देहू रोड परिसरातील बत्ती गुल; नागरिकांचे हाल
पुढारी वृत्तसेवा
देहूरोड बाजारपेठेतील वीज शनिवार (दि.28) सकाळपासूनच गुल झाली आहे. उन्हाच्या झळा व त्यात वीज गुल झाल्याने देहूरोडकरांचे हाल झाले. कर्मचार्यांकडून दुरुस्तीचे काम सुरू होते. देहूरोड परिसरात कर्मचार्यांच्या हलगर्जीपणामुळे वीज गेली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दुरुस्तीची कामे सुरू असल्याचे महावितरणकडून ग्राहकांना सांगितले जात होते.
शनिवारी सकाळी गेलेली वीज दुपारी एकच्या सुमारास आली; मात्र सुमारे पाच मिनिटांतच वीज पुन्हा गायब झाली. संध्याकाळी सातच्या सुमारास मळवली फिडरवरून अतिरिक्त लाईन घेऊन बाजारपेठेतली वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला; मात्र तोपर्यंत नागरिकांचे हाल झाले; तसेच नागरिकांची इतरही अनेक कामे खोळंबली होती.
याबाबत महावितरणचे अभियंता पुजारी यांना वारंवार लोक फोन करत होते, त्यावेळी चिंचवडवरून दोन फेज गेल्याचे कळाले. कर्मचार्यांवर देखरेख करणारे कोणी नसल्याचे त्यांच्या कामात हलगर्जीपणा सुरु असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मोठी कामेसुद्धा महावितरणचे कर्मचारी वेळेत पूर्ण करतात; मात्र शनिवारी दिवसभर बत्ती गुल झाल्यामुळे कर्मचारी नेमके काय काम करत होते, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत होते.