

इंदापूर: निरा कालव्याचे आवर्तन सध्या इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी व परिसरात सुरू झाले आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर कालव्याला पाणी आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
वाढत्या तापमानामुळे मका, गहू, हरभरा यांसह डाळिंब, पेरू, केळी, द्राक्ष यांना देखील जास्तीच्या पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. त्यात निरा डावा कालव्याला आवर्तन सोडण्यात आले आहे. या कालव्याला जोडलेल्या उपफाट्यांना देखील पाणी सोडून शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
दरम्यान, दोन गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना वरकुटे खुर्द येथील पाझर तलावावर अवलंबून असल्याने या तलावात निरा डावा कालव्याच्या चालू असलेल्या आवर्तनातून पाणी सोडण्याची मागणी निमगाव केतकी, वरकुटे खुर्द गावातील नागरिकांनी केली आहे.
याबाबत इंदापूर पंचायत समितीचे गटनेते व वरकुटे खुर्द गावचे सरपंच बापूराव शेंडे, निमगाव केतकीचे सरपंच प्रवीण डोंगरे यांनी सांगितले, की उन्हाळ्याची तीवता हळूहळू वाढू लागली आहे. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी वरकुटे खुर्द पाझर तलावानजीक असल्याने तलावात पाणी सोडल्यास ते पाझरून विहिरीत येते. त्याचा फायदा पिण्याच्या पाण्यासाठी होतो. त्यासाठी जलसंपदा विभागाने वरकुटे खुर्द पाझर तलावात पाणी सोडावे. याबाबतचे निवेदन आम्ही लवकरच देणार आहोत.
पाणीपट्टी भरण्याचे आवाहन
उपविभागीय अभियंता दशरथ एकतपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता विक्रम गायकवाड, बी. पी. काटे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व कालवा निरीक्षक भास्कर कांबळे, स्वप्निल जोशी हे कालवा क्रमांक 77 पासून शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरण्याविषयी गावोगावी आवाहन करीत आहेत. शेतकऱ्यांनी वेळच्या वेळी पाणीपट्टी भरावी, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.