

पुणे: मुळशी धरणातील एकूण सात टीएमसी पाणीवाटपाच्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर शहरासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या पाच टीएमसी पाणी पुणेकरांना तातडीने मिळावे, यासाठी महापालिका प्रशासन राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असून, त्यासाठी आवश्यक तांत्रिक आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
राज्य सरकारने मंजूर केलेल्या वाटपानुसार १ टीएमसी पाणी पीएमआरडीएला, १ टीएमसी चिंचवडसाठी आणि ५ टीएमसी पुणे महापालिकेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मात्र, मुळशी धरण हे टाटा समूहाच्या मालकीचे असल्याने पाणीपुरवठ्याबाबत आर्थिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त राज्य सरकारला पत्र पाठविणार असल्याची माहिती स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आली.
दरम्यान, शहरात सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा लागू करण्यात येत असताना कालव्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित झाला. धरणांमध्ये सुमारे पाच टीएमसी पाणी शिल्लक असताना दोन ते तीन टीएमसी पाणी कालव्यांमधून सोडले जात असल्याची माहिती सदस्यांनी दिल्याचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
जलसंपदा विभागाकडून पाणीसाठा आणि वापराबाबत चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप करत भिमाले यांनी पाणी नियोजनात गंभीर त्रुटी असल्याचे नमूद केले. शेती आणि शहर या दोन्ही घटकांना पुरेसे पाणी मिळण्यासाठी संतुलित नियोजन आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुळशीचे पाणी मिळवण्यासाठी काय करावे लागणार?
मुळशी धरणातील ५ टीएमसी पाणी मिळवण्यासाठी महापालिकेला या पाण्याचा वापर नेमका कुठे आणि कसा केला जाणार आहे, याचा सविस्तर तांत्रिक आराखडा राज्य सरकारसमोर सादर करावा लागणार आहे. पाणीपुरवठा व्यवस्था, वितरण यंत्रणा आणि भविष्यातील गरजा यांचा समावेश असलेला हा आराखडा तयार झाल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि महापालिका आयुक्त राज्याचे मुख्यमंत्री यांची भेट घेऊन पुण्यासाठी पाण्याचा कोटा अंतिम करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सध्या पुण्याला भामा-आसखेड योजनेतून सुमारे २.५ टीएमसी पाणी मिळते. त्यात मुळशी धरणातील ५ टीएमसी पाण्याची भर पडल्यास शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुढील अनेक वर्षांसाठी पाणीपुरवठ्याची मोठी समस्या दूर होण्यास मदत होईल, असा विश्वास श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त केला.