

पुणे: अठरा ते वीस तास अभ्यास करून पारदर्शक परीक्षेची अपेक्षा करणाऱ्या स्पर्धा परीक्षार्थींना पेपरफुटीचा फटका बसला आणि त्यांचा राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीवरील विश्वास उडाला. संतप्त झालेल्या स्पर्धा परीक्षार्थींनी सोमवारी हजारोंच्या संख्येने मोर्चा काढत राज्य सरकारला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आणि मागण्या मान्य न झाल्यास पुण्यात जंतरमंतरची पुनरावृत्ती करण्याचा थेट इशारा दिला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील कथित गैरप्रकार, पेपरफुटीच्या विरोधात आणि पारदर्शकतेच्या मागणीसाठी पुण्यात ओंकारेश्वर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला झालेली गर्दी ही धडकी भरवणारी असल्याचे दिसून आले. या वेळी मोर्चात खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, आमदार विश्वजित कदम, माजी आमदार मोहन जोशी, मेहबूब शेख यांच्यासह स्पर्धा परीक्षार्थींचे प्रतिनिधी, क्लासचालक आदी सहभागी झाले होते.
रोहित पवार म्हणाले, की विद्यार्थ्यांमध्ये आयोगाच्या कारभाराबाबत किती आक्रोश आहे, हे आजच्या गर्दीतून दिसून येते. विद्यार्थ्यांची मागणी आहे की, आयोगाच्या अध्यक्षांनी आणि सचिवांनी राजीनामा द्यावा. त्यांच्या जागी चांगल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती ही व्हायला पाहिजे. या प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी बोलावल्यास विद्यार्थी आणि शिक्षकांचे शिष्टमंडळ जाईल. मी जाणार नाही. पण, जर त्यांना फसवले तर आम्ही सगळे रस्त्यावर उतरू.
एमपीएससीतील येवले, नखाते आणि इतर अधिकाऱ्यांवरही त्यांनी निशाणा साधला. २०१४ पासून ते एकाच ठिकाणी असून, पीएसआय अंतर्गत परीक्षेतही मासकॉपी करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला. टीईटी, नीट, सीईटी, सरळ सेवा, कृषी सेवा परीक्षेतही भ्रष्टाचार झाला असल्याचा दावा पवारांनी केला. तसेच, येत्या तीन दिवसांत तोडगा न काढल्यास स्पर्धा परीक्षार्थींच्या पालकांना घेऊन जंतरमंतरसारखे आंदोलन करण्याचा इशारा दिला.