

पुणे: औंध लष्करी छावणीतील मराठा बटालियनने 3 आणि 4 फेबुवारी रोजी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठा दिन 2026 साजरा केला. या सोहळ्यात मराठा योद्ध्यांच्या अतुलनीय शौर्य, सर्वोच्च बलिदान आणि समृद्ध युद्धपरंपरेचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात अदम्य उत्साहाचे प्रतिबिंब दिसले, जो सैनिक आणि नागरिक या दोघांनाही प्रेरणा देणारा ठरला.
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने सिंहगडाच्या ऐतिहासिक लढाईत (1670) मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ दर वर्षी हा दिवस साजरा केला जातो. किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाला आदरांजली वाहिली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचे “गड आला, पण सिंह गेला” हे उद्गार शौर्य, नेतृत्व, देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचे कालातीत प्रतीक आहे. जे भारतीय लष्कराच्या, विशेषतः मराठा लाइट इन्फंट्रीच्या मूल्यांमध्ये खोलवर रुजलेले आहेत.
या कार्यक्रमात सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचा मिलाफ होता, ज्याचा उद्देश देशाच्या लष्करी वारशाबद्दल सार्वजनिक जागरूकता, सहभाग आणि अभिमान वाढवणे हा होता. यातील प्रमुख आकर्षणांमध्ये पाली ते दुर्गदरा अशी “तानाजी रन” ज्यामध्ये वीर तानाजी मालुसरे यांनी 300 मावळ्यांसह केलेल्या ऐतिहासिक मार्गाचे पुनरावलोकन करण्यात आले, आणि पोवाडा, गोंधळ, मार्शल आर्ट्सचे प्रात्यक्षिक आणि झांज पथक यांसारख्या पारंपरिक महाराष्ट्रीय कला सादर करणारा सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश होता.
ज्यातून या प्रदेशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा दिसून आला. दोन दिवस 3 व 4 फेबुवारीच्या मध्यरात्री सिंहगड विजयाचे नाट्यरूपांतर सादर करण्यात आले. त्यानंतर तानाजी मालुसरे स्मारकावर आदरांजली म्हणून पुष्पचक्र अर्पण समारंभ आणि शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या सोहळ्यात सिंहगड किल्ल्यापासून सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंतच्या “माउंटन टू ओशन” सायकल मोहिमेलाही हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ज्याद्वारे फिटनेस, पर्यावरण जागरूकता आणि देशभक्तीला प्रोत्साहन देण्यात आले.
माजी सैनिक आणि वीर नारींसोबतच्या संवादांमुळे सेवारत सैनिक आणि व्यापक लष्करी समुदायामधील बंध अधिक दृढ झाला. तसेच, त्यांच्या अमूल्य योगदानाच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. वरिष्ठ सेवारत अधिकारी, माजी सैनिक आणि नागरी मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झालेला मराठा दिन 2026 हा भारताच्या गौरवशाली भूतकाळाची प्रेरणादायी आठवण देणारा ठरला. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाची आठवण म्हणून मराठा बटालियनच्या वतीने मराठा शौर्य दिन साजरा करण्यात येतो.