

प्रा. अनिल धुमाळ
शिवनगर: राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तसेच माळेगाव साखर कारखान्याचे चेअरमन अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कारखान्याच्या चेअरमनपदी त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत प्रशासनाकडून सुरू असलेल्या हालचाली पाहता सुनेत्रा पवार यांच्याकडेच ‘माळेगाव’ची जबाबदारी जाण्याच्या चर्चेला उधाण आले असून, या निवडी संदर्भात सभासदांसह अधिकारी व कामगारांमध्ये तर्कवितर्क सुरू आहेत.
अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यभर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतली आहे. अजित पवार हे माळेगाव कारखान्यावर खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून ‘ब’ वर्गातून संचालक होते. दादांच्या निधनामुळे चेअरमनपदासह संचालकपद देखील रिक्त झाले आहे. खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाने दादांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर सुनेत्रा पवार यांना ‘ब’ वर्गातून प्रतिनिधित्व करण्यासाठी माळेगाव कारखाना प्रशासनाकडे शिफारस केल्याचे समजते.
त्या अनुषंगाने बुधवारी (दि. 18) होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. तद्नंतर चेअरमनपदाची निवडीसाठी प्रक्रिया राबवून सुनेत्रा पवार यांचीच चेअरमनपदी निवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या सुरू असलेल्या राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आणि कारखान्याचा कारभार समर्थपणे पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवार यांनाच चेअरमन करण्याकडे कल आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून माळेगाव कारखान्यावर पवार कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याच्या चेअरमनपदाची जबाबदारी घेतल्यानंतर कारखान्याच्या सभासदांसह कामगारांमध्ये उत्साह निर्माण झाला होता, तर मागील सात महिन्यांच्या कालावधीमध्ये अजितदादांनी कारखान्यासाठी दिलेले योगदान पाहता आणि भविष्यात माळेगाव कारखाना राज्यात अग््रागण्य कारखाना म्हणून ओळखला जावा, यासाठी अजितदादांची भूमिका स्पष्ट होती.
त्या अनुषंगाने एकूणच कारखान्याच्या सद्य:स्थितीचे अवलोकन करता सुनेत्रा पवार यांचीच चेअरमनपदी निवड व्हावी, असे संकेत मिळत आहेत. दरम्यान, कारखान्याच्या प्रगतीसाठी तसेच प्रशासकीय कामकाजात सुसंगतता येण्यासाठी सुनेत्र पवार यांचीच निवड करण्यात यावी, यासाठी संचालक मंडळासह सभासदांची भूमिका आग््राही असल्याचे दिसत आहे.