Loksabha election 2024 : कांदा उत्पादकच ठरविणार खासदार

Loksabha election 2024 : कांदा उत्पादकच ठरविणार खासदार

मंचर : पुढारी वृत्तसेवा : कांदा काढणी सुरू असून, कांद्याला बाजारभाव नसल्याने शेतकर्‍यांच्या हातात काही पडत नसल्याने शेतकरीवर्ग नाराज आहे. या नाराजीचा फटका सत्ताधारी पक्षांना लोकसभा निवडणुकीत बसण्याची चिन्हे दिसून येत आहेत. त्यामुळे एकंदरीतच उन्हात कांदा काढणारा शेतकरी कोणाला मतदान करणार ही चर्चा कांदा काढण्याच्या वेळेस होताना दिसून येत आहे. लोकसभेच्या निवडणुकीने वेग घेतला असला, तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मतदान कोणाला होते, यावरच विजयी उमेदवाराचे गणित अवलंबून आहे.

सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली जाते. या लागवड केलेल्या कांद्याची काढणी आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात सुरू झाली आहे. उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर असतानाही एकाच वेळी ही कांदे काढणी सुरू आहे. कांद्याची पात उन्हामुळे वाळून गेल्याने सर्वच शेतकरी कांदा काढणी करण्यासाठी घाई करत आहे. परिणामी, कांदा काढण्यासाठी मजुरांना मागणी जास्त, तर मजुरांची संख्या कमी यामुळे मजूरटंचाई भेडसावत आहे. सध्या मजुरांना 250 ते 300 रुपये मजुरी, तर 100 रुपये गाडीभाडे अशा पद्धतीने 350 रुपये मजुरी द्यावी लागत आहे.

हे मजूर साडेदहा ते अकरा वाजता शेतात येतात. त्यानंतर दुपारी एक तास जेवणाची सुटी आणि संध्याकाळी पाच वाजले की मजुरांची सुटी होते. त्यामुळे मजुरीच्या मानाने काम होत नाही, अशी काही शेतकर्‍यांची भावना आहे. परंतु मजूरच मिळत नसल्याने मिळेल त्या भावात मजूर घेऊन कांदा काढणी करावी लागत आहे. शेतकर्‍यांचा कांद्यासाठी झालेला भांडवली खर्च, झालेली मजुरी व सध्या कांद्याला मिळत असणारा 10 किलोसाठी प्रतवारीनुसार 130 ते 160 याप्रमाणे बाजारभाव मिळत असल्याने शेतकर्‍यांच्या हातात काही पडत नसल्याने शेतकरीवर्ग मात्र नाराज आहे. या नाराजीचा फटका सत्ताधारी पक्षांना लोकसभा निवडणुकीत बसण्याची चिन्हे दिसून येत आहेत. त्यामुळे एकंदरीतच उन्हात कांदा काढणारा शेतकरी कोणाला मतदान करणार ही चर्चा कांदा काढण्याच्या वेळेस होताना दिसून येत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news